मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ दिल्याचा महायुती सरकारचा निर्णय कर्मचा-यांच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरसकट सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६५०० रुपयांची पगारवाढ एप्रिल २०२० पासून देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लीच झालेल्या बैठकीत स्पष्ट सांगितले होते. पण ही पगारवाढ एप्रिल २०२० पासून नाही तर सप्टेंबर २०२४ पासून लागू होणार आहे. ही एस टी कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक असून सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एप्रिल २०२० पासूनच पगारवाढ लागू व्हायला हवी होती. तसेच दिलेल्या आश्वासना प्रमाणे झाली असती तर साधारण ३२०० कोटी रुपयांच्या रक्कमेचा फरक एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला असता. पण मिनिट्स काढताना एसटी आर्थिक परिस्थिती सुधारल्या नंतर फरक दिला जाईल असे स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ सरकारने आपला शब्द फिरवला आहे असेही बरगे यांनी म्हटले आहे.
या शिवाय बाकी मुद्यांवर तर वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. वार्षिक वेतनवाढ प्रलंबित फरकाबद्दल सुद्धा मिनिट्स मध्ये स्पष्टता नसून महागाई भत्त्याच्या थकबाकी बद्दल सुद्धा काहीही स्पष्टता नाही.२०१६ पासूनची वार्षिक वेतनवाढ फरक रक्कम प्रलंबित असून २०१८ पासूनची महागाई भत्त्याची फरक रक्कमही प्रलंबित आहे . या दोन्ही रक्कमा मिळून एकूण अंदाजे १२०० कोटी रुपयांची रक्कम देण्यात कर्मचाऱ्यांची फसवणूक झाली असून सरकारने लबाडी केल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.