मुंबई: मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या कामाच्या तणावामुळे मुंबईतील विक्रोळी येथील एका महिला शिक्षिकेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.
झोपेच्या सात गोळ्या घेतल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात एसआयआरचे वाढते काम, सततचे फोन आणि मानसिक तणावामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे शिक्षिकेने म्हटले आहे.
विक्रोळी येथील संबंधित शिक्षिका रविवारी रात्री उशिरापर्यंत घाटकोपर परिसरात एसआयआरचे काम करत होत्या. विविध चौकशींसाठी दिवसभर सतत फोन येत असल्याने मानसिक ताण वाढत होता.
सोमवारी सकाळी शाळेत जाण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी एका माजी विद्यार्थ्याच्या समाजमाध्यमावरील पोस्टचा स्क्रीनशॉट पाठविला. शिक्षकांकडून अध्यापनाऐवजी अन्य कामे करून घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा उल्लेख त्या पोस्टमध्ये होता. त्यामुळे मानसिक तणाव अधिक वाढल्याचे शिक्षिकेने जबाबात नमूद केले आहे.
शाळेत पोहोचल्यानंतर त्यांनी झोपेच्या सात गोळ्या घेतल्या. त्यानंतर मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधल्यानंतर त्या बेशुद्ध झाल्या. सहकारी शिक्षकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सारोदे यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत शिक्षकांवरील, विशेषतः महिला शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा भार तातडीने कमी करण्याची मागणी केली.
शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. बीएलओ आणि एसआयआर (विशेष संक्षिप्त पुनरीक्षण) या कामामुळे अतिताणामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबईसाठी स्वतंत्र बैठकीची मागणी
शिक्षक भारतीच्या उपाध्यक्षा नंदा कांबळे यांनी सांगितले की, एसआयआर ड्युटीवरील शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिक्षणाधिकारी, तहसीलदार कार्यालय आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला; मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.