मुंबई: दशकानुदशकांचे अंतर्गत मतभेद, मानकऱ्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे कुलूपबंद असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरे पुन्हा उघडली असून तिथे चैतन्याचा घंटानाद घुमू लागला आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाने मुंबईत खास पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संजय जोशी यांनी सांगितले की, महासंघाने राबवलेले नामसत्संग, माणगावमधील जिल्हास्तरीय मंदिर परिषद आणि प्रत्यक्ष संवाद या त्रिसूत्रीमुळे घारपीचे बंद मंदिर उघडले, माडखोलमधील विखुरलेले मानकरी एकत्र आले तर पडवे, ओसरगाव आणि उगाडे येथील देवस्थानांनी धर्मरक्षणाची कास धरली. ‘मंदिरे ही धर्माची आधारशिला आहेत. सिंधुदुर्गात घडलेला हा बदल केवळ मंदिरांचे दरवाजे उघडणे नसून ती हिंदू समाजाच्या संघटित होण्याचे लक्षण आहे, असही जोशी यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्गनगरीतही पत्रकार परिषद घेत सनातन संस्थेच्या प्रतिनिधींनी याची सविस्तर माहिती दिली. यावेळी धर्मप्रचारक सदगुरू सत्यवान कदम, मंदिर महासंघाचे शरद राऊळ, यशवंत परब, हिंदु जनजागृती समितीचे राजेंद्र पाटील, मंदिराचे मानकरी लिंग माऊली देवस्थान ओसरगावचे सर्वश्री घनश्याम राणे, देव रवळनाथ मंदिर पडवे ता. मालवणचे गोविंद रामचंद्र परब, माऊली मंदिर, घारपी येथील शिवराम गावडे, दीपक गावडे, विलास गावडे, श्री पावणाई रवळनाथ मंदिर, माडखोलचे दत्ताराम राऊळ, ग्रामपुरोहित जनार्दन भागवत, श्री भावई मंदिर कुणकेरीचे सुनील राऊळ, मंदिर महासंघाचे जीवन केसरकर सुनिल परब, घनश्याम राणे, रामचंद्र चव्हाण हे उपस्थित होते.
घारपी (ता. सावंतवाडी) : येथील ग्रामदैवताचे मंदिर दोन दशकांपासून मतभेदांमुळे पूर्णतः बंद होते. वार्षिक धार्मिक कार्यक्रम आता उत्साहात सुरू झाले आहेत.
माडखोल (ता. सावंतवाडी) ः नामसत्संगातून मानकऱ्यांचे संघटन शक्य झाले. श्री पावणाई रवळनाथ मंदिरात मानकऱ्यांमध्ये असलेल्या दुराव्यामुळे व्यवस्थापनात अडथळे येत होते.
पडवे व ओसरगाव (ता. कुडाळ) ः श्री देव रवळनाथ मंदिर (पडवे) आणि श्री लिंग माऊली मंदिर (ओसरगाव) ही देवस्थाने पूर्वापार चालत आलेल्या प्रथा-परंपरेप्रमाणे चालवण्यात अडचण येत होती. मात्र माणगाव येथील जिल्हास्तरीय मंदिर परिषदेतून प्रेरणा घेत येथील विश्वस्त आता आपल्या प्रथापरंपरा अबाधित राखण्यासाठी सक्रिय झाले आहेत.
उगाडे (ता. दोडामार्ग ) ः सुव्यवस्थापन आणि धर्मशिक्षण येथील विश्वस्त मंदिर महासंघाशी जोडले गेल्यावर त्यांनी मंदिराच्या पवित्र्यासाठी ठोस पावले उचलली. मंदिरात वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्यासोबतच धर्मशिक्षणाचे फलक, सामूहिक आरती आणि साधना सत्संग सुरू केले आहेत.