मुंबई: श्रावण महिना सुरू झाल्याने मुंबईतील फळ बाजारात विशेषत:उपवासासाठी सफरचंद, डाळिंब आणि केळी यांना सर्वाधिक ग्राहकाकडून मागणी वाढत आहे. यासाठी शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी ग्राहक फळे घेण्यासाठी बाजारात गर्दी करतात.
महात्मा फुले फळ बाजारसह भायखळा रेल्वे स्थानक शेजारी, बोरिवली येथील मुंबई महापालिकेच्या फळबाजारात ही यादिवशी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची लगबग असते. बाजारात सर्वप्रकारच्या फळांची आवक वाढली असली तरी दरामध्ये कोणतेही वाढ झाली नाही.
फळाचे दर स्थिर असल्याचे महात्मा फुले (क्रॉफर्ड मार्केट)फळ बाजारातील विक्रेत्यांनी सांगितले. फळबाजारात सध्या देशी सफरचंद जम्मू काश्मीर,हिमाचल प्रदेश येथून बाजारात मोठ्या प्रमाणात आवक आली आहे. सफरचंद प्रतिकिलो सरासरी १५० रुपयापासून ते २०० रुपयांपर्यंत, डाळींब सरासरी ८० रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत, केळी ५० रुपयापासून ते ८० रुपया पर्यंत असे दर आहेत.
फळांचे प्रतिकिलो दर
मोसंबी २९ रुपयापासून ते ५० रुपयांपर्यंत आणि संत्री सरासरी १०० रुपये पर्यंत किलो आहेत. याचबरोबर चेरी १२००, पपई नग ८०, काळे कलिंगड ३५ ते ४० रुपये,अननस १०० रुपये,ग्रे फ्रूट २५० रुपये प्रति किलो, लिची ३५० किलो,सिताफळ २५० किलो, पेरू १५० ते ३०० रुपये प्रतिकिलो असे दर आहेत. प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी व रविवारी असे दोनच दिवस फळांची विक्री सर्वाधिक होते.
श्रावण संपल्यानंतर गणेशोत्सव काळात सर्वप्रकारच्या फळांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. आवक कमी झाली तरच दरात वाढ होते.पण;आवक जास्त असली तर फळांचे दर स्थिर राहतात किंवा किंचितशी त्यात वाढ होते.- अशोक पोखरकर विक्रेते, महात्मा फुले मंडई