मुंबई: पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या ऊर्जा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी कठोर निर्णय घेतले आहेत. त्यांचे आमच्याशी वैचारिक मतभेद असले तरी मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे कोणीही राजकारण करू नये,असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुंबईत मंगळवारी व्यक्त केले.
पुण्यातील लक्ष्मणराव गुट्टे रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनतर्फे माजी प्रदेश पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांचा कृतज्ञता व स्नेह मेळावा मराठी पत्रकार संघात झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत,आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर,रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार सुनील भुसारा, रंजन ठाकरे यांच्यासह माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, मी सुरुवातीला बारामती युवक काँग्रेसचा प्रमुख झालो. त्यानंतर 4 वर्षांनी महाराष्ट्राचा प्रमुख झालो. माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेटून शेतकऱ्यांचे आणि इतर प्रश्न त्यांच्या समोर मांडले.
तसेच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य समजतो. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांची आमची वैचारिक भूमिका वेगळी असेल. पण महाराष्ट्राची प्रतिमा देशात जपण्याची काम ते करीत असून त्यांनी आज देशहितासाठी घेतलेल्या निर्णयावर कोणीही राजकारण करू नये, असेही शरद पवार म्हणाले.
यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, मी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. त्याकाळात शरद पवार यांच्याकडून मी भरपूर शिकलो. त्यांची ऊर्जा घेऊन काम करत राहू, असेही मंत्री आबिटकर म्हणाले.
आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, आज जरी मी वेगळ्या पक्षाचा आमदार असलो, तरी मी शरद पवार यांच्या तालमीत शिकलो आहे आणि घडलोही आहे. आमच्या वडिलांपासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
खासदार धैर्यशील माने म्हणाले,माझी राजकीय जडणघडण शरद पवार यांच्यामुळे झाली. शरद पवार यांनी राजकारणात महिलांना संधी दिली. मी खासदार म्हणून याठिकाणी आलो नाही, तर त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो आहे. शरद पवार यांनी माझ्या आईला खासदार केले. दिल्लीत माझ्या निवासस्थानी शरद पवार यांचा फोटो आहे, असे खासदार माने यांनी आवर्जून नमूद केले.