शरद पवार pudhari photo
मुंबई

NCP merger : शरद पवार गट काँग्रेसमध्‍ये विलीनीकरणास उत्‍सुक

खासदारांमधील मतभेदांमुळे विलंब

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : लोकसभेत दोन तृतीयांश बहुमतासाठी भाजपच्या धुरिणांनी राज्यातील उद्धव ठाकरे गटाचे खासदार फोडल्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सावध झाले आहेत. पवार यांनी, संभाव्य पर्याय म्हणून काँग्रेसमध्ये आपल्या गटाचे विलीनीकरण करण्याची तयारी सुरू केली आहे. पण यात काही खासदारांचा सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपकडे ओढा असून ते काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे आहे.

केंद्रातील भाजप नेतृत्वाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ठाकरे गटाचे सहा खासदार फोडले. हे ऑपरेशन टायगर यशस्‍वी झाल्‍यानंतर ऑपरेशन तुतारीच्‍या माध्‍यमातून आता शरद पवार गटाचे खासदार फोडले जाणार असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार गटाचे ८ खासदार आणि १० आमदार आहेत. यातील काही खासदारांचा भाजप आणि शिंदे गटाकडे ओढा आहे.

अजित पवार हे हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार होते. पण अजित पवार गटाचे नेतृत्व आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. या गटातील काही नेत्यांचा शरद पवार गटासोबत जाण्यास विरोध आहे. तसेच भाजपचे केंद्रीय नेतृत्व असे होऊ देणार नाही. त्यामुळे तूर्तास हे दोन्ही गट एकत्र येतील, अशी शक्यता नाही. तसेच सुनेत्रा पवार गटात जाण्यास कोणीही खासदार इच्छुक नाही.

प्रादेशिक पक्षांत मोठ्या प्रमाणात फूट पाडण्याचे कारस्‍थान सुरू असल्याने शरद पवार हे आपला गट काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक सूत्राने सांगितले. शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत दोनवेळा पक्ष स्थापन केले. पण ते उघडपणे भाजपसोबत गेले नाहीत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सत्ता स्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देऊ केला होता हे अपवाद आहे.

पवार यांची काँग्रेस पक्षश्रेष्ठीशी चर्चा झालेली आहे. काँग्रेसने काही वर्षापूर्वीच राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे काँग्रेस यास तयार आहे. शरद पवार गट विलीन झाला तर काँग्रेसची ताकद वाढेल. तसेच शरद पवार गटाला फुटीचे भय राहणार नाही. याबदल्‍यात शरद पवार गटाकडून काँग्रेसकडे काही मागण्या करण्यात आल्या आहेत.

या गटाचे राष्ट्रीय स्तराप्रमाणे राज्यात आमदार, खासदारांचे मतदारसंघ अबाधित राहिले पाहिजेत, ही महत्त्‍वाची मागणी त्‍यात आहे. पण एकीकडे पवार हे आपला गट काँग्रेसमध्ये विलीनीकरणच्या तयारीत असताना काही खासदार मात्र भाजप आणि शिंदे गटासोबत गेले पाहिजे. आतापर्यंत विरोधी पक्षात होतो, आता जायचे असेल तर सत्तेसोबत जाऊया, जेणेकरुन मतदारसंघासाठी विकास निधी मिळेल, अशा भूमिकेत ते आहेत. पक्षातील या दोन मतप्रवाहांमुळे निर्णय घेण्यास विलंब होत आहे.

शरद पवारांना ठपका नको

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. यापूर्वी पवारांना भाजपसोबत येण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने अनेक प्रस्ताव दिले होते. पण त्यांनी ते नाकारले होते. आयुष्यभर समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणी जपणार्‍या शरद पवारांना आता निवृत्तीच्‍या वयात भाजपसोबत गेल्याचा ठपका नको आहे. कट्टरपंथीय विचारसरणीपेक्षा काँग्रेस हाच पर्याय योग्य असल्याचे त्यांना वाटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT