मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यामुळेच 2022 मध्ये भाजप सत्तेत आली. या सत्तेच्या जोरावर भाजप राज्यात अधिक शक्तीशाली बनली, असे विधान शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री शंभूराज देसाई यांनी केल्याने महायुतीतून प्रतिक्रिया येत आहेत.
राज्याच्या राजकारणात सध्या सत्तेच्या श्रेयवादावरून जोरदार चर्चा सुरू आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनही सोमवारपासून नागपूरमध्ये सुरु होत आहे. तेथे सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता असताना सरकारमधील मंत्री असणाऱ्या शंभूराज देसाई यांनी थेट महायुतीतील थोरला भाउु असणाऱ्या भाजपलाच टोला लगावला आहे. देसाई यांनी म्हटले आहे की, 2014 पर्यंत भारतीय जनता पक्ष राज्यात इतका मजबूत नव्हता. परंतु एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने भाजपला सत्तेत चांगला वाटा मिळाला आणि शिवसेना-भाजप युती पुनरुज्जीवित झाली. शंभूराज देसाईंच्या या विधानानंतर महायुतीमधील इतर नेत्यांकडूनही प्रतिक्रिया उमटल्या. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी “आम्ही क्रांती केली म्हणून राज्यात महायुती सरकार आले” असे म्हटले.त्यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी “महायुती होती म्हणून आपण सत्तेत आहोत” असे सांगत, कोण कुणामुळे सत्तेत आहे ही श्रेयवादाची लढाई नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिघे एकत्र असल्यामुळेच सत्तेत आहेत आणि याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही समन्वयाने काम करत असल्याचे सांगत बन यांनी सावध प्रतिक्रिया दिली.