मुंबई: निवडणूक आयोग हा भाजपचा हस्तक असून तेथील ज्ञानेश कुमार नावाचे सद्गृहस्थ याला केंद्र सरकार डिलिमिटेशन कमिशनर करणार होते. त्यांच्या घरावर भाजपचा झेंडाच फडकतोय. आता केवळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा लावायचा बाकी उरला आहे, अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.
ज्या माणसाविरुद्ध महाभियोग प्रस्ताव बहुमत असताना उपराष्ट्रपतींनी फेटाळून लावला, त्या निवडणूक आयोगाकडून आम्ही कोणती अपेक्षा करणार, असा सवाल करत हा निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारी आहे. सध्याचा निवडणूक आयोग हा लोकशाही आणि संविधानाला धाब्यावर बसवून केवळ सत्ताधारी पक्षाचा ‘हस्तक’ म्हणून काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुंबई, महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’
मुंबईतील नेस्को ड्रग्ज प्रकरणावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. फडणवीसांच्या कार्यकाळात मुंबई आणि महाराष्ट्र हे ‘उडता पंजाब’ बनले असून राज्याला ड्रग्ज कॅपिटल बनवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.
साताऱ्यातील दरे गावाजवळ देशातील सर्वात मोठी ड्रग्ज फॅक्टरी पकडली गेली होती. परंतु मंत्रिमंडळातील काही लोकांना वाचवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच हे प्रकरण दाबल्याचा दावा करत राऊत यांनी गुजरात कनेक्शनवरही बोट ठेवले.