मुंबई: कुंभमेळ्यानिमित्त नाशिक येथे आयोजित केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाकडे नाशिककरांनी पाठ फिरवली. कार्यक्रमस्थळी खुर्च्या रिकाम्या होत्या, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कुंभमेळ्यासाठी काढलेल्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. नाशिकमधील हा भ्रष्टाचार राज्यातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. यामुळे नाशिककरांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे पाठ फिरवली, असे संजय राऊत म्हणाले. लोक आता भाजप नेत्यांच्या भाषणाला कंटाळले आहेत. विकासाच्या नावाने भ्रष्टाचार सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
खुर्च्या मोजण्यापेक्षा आपल्या पक्षाची शिल्लक संख्या मोजा! भाजपचे प्रत्युत्तर
नाशिकचा कुंभमेळा गाजत आहे. ठाकरे गटाच्या पोटात दुखत आहे. कुंभमेळ्याच्या गर्दीवर प्रश्न नको, आधी ठाकरे गटाच्या रिकाम्या खुर्च्यांकडे पाहा. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असे नवनाथ बन म्हणाले.
साधुसंतांवर बोलण्याआधी पालघरच्या साधू हत्याकांडाबाबत आपली भूमिका काय होती याचे आत्मचिंतन करा. संजय राऊत यांना साधुसंतांची एलर्जी आहे. पालघरचा इतिहास महाराष्ट्र विसरलेला नाही, असे नवनाथ बन यांनी सांगितले.