मुंबई : नेपाळ-तिबेट भागात झालेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली असून, शनिवारी सकाळी १० पर्यंतच्या अधिकृत परिस्थिती अहवालानुसार, ३३८ नागरिकांशी संपर्क प्रस्थापित झाला असून ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ६६ नागरिकांशी अद्याप थेट संपर्क होऊ शकलेला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. रिचा टूर्स प्रा. लि. या संस्थेमार्फत गेलेल्या ६० नागरिकांचा गट अद्याप नॉट रिचेबल आहे. त्यामुळे संपर्कात नसलेल्या नागरिकांचा शोध घेणे हे प्रशासनासमोरचे सर्वात मोठे आव्हान ठरले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने चीन-तिबेट परिसरातील १४९ भारतीयांची यादी महाराष्ट्राला दिली आहे. संबंधित जिल्हा प्रशासनाकडून या सर्वांची माहिती पडताळणी सुरू आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने माहिती संकलनासाठी वेबआधारित लिंक सुरू केली असून ती सर्व जिल्ह्यांत माध्यमांद्वारे पोहोचवली आहे. ती परराष्ट्र मंत्रालयाला पाठवली जाईल.
नागपूरकर सुखरूप मायदेशी
अडकलेल्या ४०४ नागरिकांपैकी नागपूरमधील १०५ नागरिक भारतात परतले आहेत. तसेच ३७ नागरिक सागा (मानसरोवरजवळील परिसर) येथून भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत.
कुटुंबीयांशी सतत संपर्क
अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी मदत कक्ष सुरू करण्यात आला असून प्रशासनाकडून प्रवासी संस्था आणि कुटुंबीयांशी हेल्पलाईनद्वारे सतत संपर्क ठेवला जात आहे.
बेपत्ता नागरिकांचा शोध सुरूच
परराष्ट्र मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाच्या समन्वयातून आवश्यक बचाव पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली असून बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे.
संपर्काबाहेरील सर्व भारतीयांची चिंता
संपर्काबाहेरील सर्व भारतीयांच्या माहितीच्या पडताळणीवर सध्या सर्वाधिक लक्ष आहे. जिल्हा प्रशासन, महाराष्ट्राचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्यात समन्वय साधून शोधमोहीम आणि सुरक्षित परतीची प्रक्रिया सुरू आहे.