Sanjay Raut Criticizes PM Narendra Modi
मुंबई: "पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलत आहेत, याकडे देश आता गांभीर्याने पाहत नाही. त्यांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे. भाजपवर आलेल्या संकटावर देशाला संबोधित करणे चुकीचे आहे, अशा बोचऱ्या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महिला आरक्षण, पुलवामा आणि महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवरून भाजपला धारेवर धरले.
संजय राऊत म्हणाले की, विधानसभा निवडणुका सुरू असताना महिला आरक्षणावर भाष्य करणे हा थेट आचारसंहितेचा भंग आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या विधानांसाठी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करत काँग्रेसशिवाय देशाचे नेतृत्व कोणीही करू शकत नाही, हे मोदी आपल्या वागण्यातून वारंवार सिद्ध करत आहेत," असा टोलाही त्यांनी लगावला.
महिला आरक्षणावरून भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, ५४३ जागा दिल्या, तर भाजपमधील मोठ्या नेत्यांच्या जागाही राखीव होऊ शकतात, याची भीती त्यांना वाटतेय. या विधयकामुळे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ब्रिटिशांसारखेच फोडा आणि राज्य करा, हे भाजपचे एकमेव तत्व असल्याचा आरोप त्यांनी केला.
"लव्ह जिहाद किंवा लोकांनी काय खावे, यावरून मोदींना देशाला कायम पेटवत ठेवायचे असते. पुलवामामध्ये जवान शहीद झाले, तेव्हा तिथल्या महिलांचा आक्रोश मोदींना दिसला नाही. आता हे ढोंग बंद करा, जग तुमच्यावर हसत आहे. सगळी सूत्रे हिंदूंकडे असताना धर्म धोक्यात कसा? आणि जर धोक्यात असेल तर आम्ही (शिवसेना) आहोतच ना!, असेही ते म्हणाले.
"देवेंद्र फडणवीस आणि मोदींनी सांगावे की 'खान'ची खानावळ तुम्हीच चालवली आहे ना? सलमान खान, शाहरुख खान हे तुमच्याच पक्षासोबत जास्त असतात. नारायण राणे यांच्या वाढदिवसाला किती 'खान' गेले होते? ते तर मोदींचेच चेले आहेत. टीसीएस (TCS) मधील प्रकरण आणि अशोक खरात प्रकरणी सखोल माहिती समोर आली असती, तर अनेक मंत्र्यांवर कारवाई झाली असती. आज देशात नरेंद्र मोदी फेल झाले आहेत, तर राज्यात देवेंद्र फडणवीस फेल ठरले आहेत," अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.