मुंबई : समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत राज्यातील 3 हजार 378हून अधिक कंत्राटी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर आक्रमक भूमिका घेत बेमुदत उपोषण आंदोलन छेडले आहे. 9 मार्चपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला 17 दिवस उलटून गेले तरी शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने आंदोलन तीव्र झाले आहे.
शालेय शिक्षण विभागातील विविध योजना राबवणारे हे कर्मचारी आंदोलन करत आहेत. ‘माझी शाळा सुंदर शाळा’, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, ‘यू-डायस’ डेटा भरणे, शिक्षक प्रशिक्षण, दिव्यांग शिक्षण, मध्याह्न भोजन योजना आदी जबाबदाऱ्या सांभाळणारे हे कर्मचारी गेल्या 18 ते 20 वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. तुटपुंज्या वेतनावर सेवा बजावत असतानाही त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतले जात नसल्याने तीव्र नाराजी आहे.
देवळा तालुक्यातील विष्णू केदारे यांनी सांगितले की, आम्ही 20-25 वर्षे शिक्षण विभागासाठी काम करतोय. आमच्यात अनेक जण उच्चशिक्षित असून पीएचडीधारकही आहेत. तरीही आम्हाला 20 ते 30 हजार रुपयांच्या वेतनावर काम करावे लागते. तर जिल्हा बालरक्षक समन्वयक वैशाली शिंदे यांनीही शासनावर टीका करत, गेली सहा वर्षे आमच्या वेतनात वाढ झालेली नाही. आमच्यापैकी काहींना कायम करून बहुतांश कर्मचारी यांना डावलले जात आहे, हा अन्याय आहे, असे स्पष्ट केले.