मुंबई: समग्र शिक्षामध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी अमरावती जिल्ह्यातील विजय बापुराव दामले यांचे वयाच्या 51 व्या वर्षी अंजनगाव सुर्जी येथे हृदयविकाराने शनिवारी निधन झाले,अशी माहिती समग्र शिक्षा संघर्ष समितीने पत्रकाद्वारे दिली.
मुंबईतील आझाद मैदानात 61 दिवस आंदोलन करूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले कंत्राटी कर्मचारी दामले यांनी अखेर जगाचा निरोप घेतला.मृत दामले यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी,अशी संघर्ष समितीची मागणी आहे.
विषयसाधन व्यक्ती गटसाधन केंद्र धरणी येथे कंत्राटी कर्मचारी म्हणून दामले कार्यरत होते.आझाद मैदानात समग्र शिक्षाच्या उर्वरित 13 कॅडरच्या कर्मचाऱ्याचे दोन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे.आंदोलनात न्याय न मिळाल्यामुळे अधिकचा ताण येऊन काल शनिवारी अंजनगाव सुर्जी गावामध्ये दामले यांचे हृदयविकाराने निधन झाले.
कडक उन्हाळा असल्याने आंदोलनातील अनेक कंत्राटी कर्मचारी यांच्या तब्येत बिघडत आहेत.अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेल्या आठवड्यात संघर्ष समितीने आपली व्यथा मांडली होती.त्यांनी सकारात्मक निर्णय होईल असा शब्दही दिला होता.दामले यांचे कुटुंब वाऱ्यावर पडले आहे.त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही. शासनाकडून त्यांना आर्थिक मदत मिळावी. आतापर्यंत सेवेच्या काळात 271 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान,कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी गुरुवारी मुख्य सचिव यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक आहे.आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
2024 च्या शासन निर्णयाने समग्र मधील अर्ध्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेतले.उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अभ्यास समिती नेमली व अहवाल तयार होऊन 6 महिने झाले,तरी बैठकांच्या तारखांच्या दिरंगाईमुळे अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मृत्यू नंतरही न्याय मिळत नाही.
14 मे रोजी होणाऱ्या मुख्य सचिव यांच्या बैठकीत तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांना नाय मिळेल का याकडे सर्व कर्मचारी आशेने पाहत आहेत असे पत्रक समितीच्या अध्यक्षा योगिता बलाक्षे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.