घाटकोपर: गेल्या तीन ते चार महिन्यांपासून साकीनाका, मरोळ भागातील कुर्ला -जरीमरी रस्ता, विमानतळ मार्ग तसेच आरे कॉलनीकडे जाणारा मरोळ - मोरोशी हा मुख्य रस्ता आणि इतर काही उपरस्ते यावरील गटार व नाल्यांचे बांधकाम तसेच रस्त्यांचे काँक्रिटीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यासाठी जेसीबी तसेच इतर मशीनच्या सहाय्याने रस्ते खोदण्याचे काम रात्रंदिवस सुरू असून जेसीबी व ड्रील मशीनचा प्रचंड आवाज तसेच वातावरणातील धूळ आणि मातीमुळे नजिकचेे रहिवासी त्रस्त झाले आहेत.
रस्त्याच्या खोदकामाबरोबरच या भागात खासगी विकासाकांकडूनही मोठ्या प्रमाणात रहिवासी तसेच व्यावसायिक इमारतींचे काम चालू आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून रस्त्याची साईडपट्टी, दुकाने, घरे, इमारती तसेच झाडेझुडपे यावर प्रचंड धूळ साचली आहे.
रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव वाहनांमुळे सतत उडणाऱ्या धुळीचा नागरिक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सतत उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून दमा, खोकला किंवा श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मानवी जीवनाबरोबरच निसर्ग, झाडेझुडपे आणि पशुपक्ष्यांवरही याचा परिणाम दिसून येत आहे. या भागातील झाडेझुडपे धुळीने माखून गेली आहेत. पाने, फुले, फळांवरही मोठ्या प्रमाणात धूळ साचल्याने पक्षांचे अन्नपाणी व आधिवासही धोक्यात आला आहे. धूळ व हवेतील प्रदूषक घटक पक्षांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतात.
धुळीमुळे पक्षांची श्वसन संस्था बिघडणे, डोळ्यांची जळजळ, फुफुसाचे आजार असे परिणाम दिसून येतात.बांधकाम क्षेत्र, वाहनांचा धूर व कोरडे हवामान पक्ष्यांची पचन संस्था बिघडवण्यास कारणीभूत ठरत असल्याचे मत पक्षीतज्ञांनी व्यक्त केले. संबंधित यंत्रणेने विकासकामांबरोबरच निसर्ग व मानवावर होणाऱ्या परिणामाची दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.