मुंबई : महायुतीचा घटक पक्ष असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंने मुंबईत भाजपशी असलेली युती तोडून स्वबळावर महापालिका निवडणूक लढण्याची घोषणा केली. ३९ जागांवरील उमेदवार आठवले यांनी मंगळवारी जाहीर केले.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांना जागावाटपात सन्मानाचे स्थान देणार, असे सांगितले होते. परंतु, भाजपने आमच्या स्वाभिमानावर आघात करत आम्हाला धोका दिला, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मुंबईत आम्ही ३९ ठिकाणी निवडणूक लढणार असल्याची घोषणा आठवले यांनी केली. महायुतीने यावर तोडगा काढला नाही तर या निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
महायुतीच्या जागावाटपात रिपाइंला जागा न दिल्याने रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, जागावाटपात रिपाइंला १४-१५ जागा सुटतील असे आम्हाला वाटले होते. २०१२ मध्ये शिवसेना-भाजपची युती असताना आमच्या पक्षाला २४ जागा मिळाल्या होत्या. त्याप्रमाणे यंदाही आम्हाला जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपकडून आम्हाला धोका देण्यात आल्याने आम्ही मुंबईत युती तोडली आहे.
मुंबईत आम्ही स्वतंत्रपणे ३९ उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून त्यांना एबी फॉर्मही दिले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अर्ज मागे घेण्यापर्यंत आमच्या पक्षासाठी काही जागा सोडण्याचा निर्णय महायुतीने घ्यावा, अन्यथा आम्ही उमेदवारी अर्ज भरलेल्या ठिकाणी निवडणूक लढवू, असा इशाराही आठवले यांनी दिला.
फक्त मुंबईत युतीमधून बाहेर
रिपाइंला जागा मिळाल्या नसल्याने आम्ही फक्त मुंबईत युती तोडली आहे. आम्ही ३९ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देणार. मात्र, ३९ जागा सोडल्यास उर्वरित ठिकाणी आम्ही भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करून महायुतीला सत्तेत आणण्याचा प्रयत्न करणार, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
आज काढणार तोडगा
दरम्यान, आठवलेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू सहकारी आमदार प्रवीण दरेकर यांना रामदास आठवलेंची भेट घेण्यास पाठविले. दरेकर यांनी वांद्रे येथे आठवलेंची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली. मात्र, भाजपने आम्हाला अपेक्षित असलेल्या जागा न दिल्यास आम्ही निवडणूक लढवणारच, असे आठवले यांनी ठामपणे सांगितले. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रामदास आठवले यांच्या उपस्थितीत उद्या, बुधवारी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती रिपाइंच्या सूत्रांनी दिली.
रिपाइंचे उमेदवार असे...
स्नेहा सिध्दार्थ कासारे (प्रभाग १८६), रॉबीनसन मारन नायागम (प्रभाग १८८), बापूसाहेब योहान काळे (प्रभाग १८१), सचिनभाई दयानंद मोहिते (प्रभाग २००), रमेश शंकर सोनावणे (प्रभाग १४६), दीक्षा रवींद्र गायकवाड (प्रभाग १५२), ज्योती अजित जेकटे (प्रभाग १५५), प्रज्ञा सुनील सदाफुले (प्रभाग १४७), संजय एकनाथ डोळसे (प्रभाग १४८), शिल्पा सतिश बेलमकर (प्रभाग १५०), मनीषा संजय डोळसे (प्रभाग १५३), संजय उद्धव इंगळे (प्रभाग १५४), निलिमा निलेश मानकर (प्रभाग १९८), गणेश शंकर वाघमारे (प्रभाग २१०), विनोदकुमार बनवारीलाल साहू (प्रभाग २२३), मनोहर वासुदेव कुलकर्णी (प्रभाग २१४), श्रावण यमाजी मोरे (प्रभाग ९०), नितीन चंद्रकांत कांबळे (प्रभाग ८९), सचिन शांताराम कासारे (प्रभाग ९३), विक्रांत विवेक पवार (प्रभाग ९८), नम्रता बाळासाहेब गरुड (प्रभाग १५१), विनोद भाऊराव जाधव (प्रभाग १०४), रागिणी प्रभाकर कांबळे (प्रभाग १०३), राजेश सोमा सरकार (प्रभाग १२०), हेमलता सुनील मोरे (प्रभाग ११८), राजेंद्र कृष्णा गांगुर्डे (प्रभाग १२५), भारती भागवत डोके (प्रभाग १३३), सतिश सिध्दार्थ चव्हाण (प्रभाग १४०), यशोदा शिवराज कोंडे (प्रभाग २८), अभिजित रमेश गायकवाड (प्रभाग २६), रेश्मा अबु खान (प्रभाग ५४), छाया संजय खंडागळे (प्रभाग ८१), अजित मुसा कुट्टी (प्रभाग ५९), जयंतीलाल वेलजी गडा (प्रभाग ६५), बाबू अशापा धनगर (प्रभाग ६३), वंदना संजय बोरोडे (प्रभाग ३८), राधा अशोक यादव (प्रभाग ३९), प्रेमलता जितेंद्र शर्मा (प्रभाग ४०), धनराज वैद्यनाथ रोडे (प्रभाग ४३)