मुंबई : अदिती कदम
रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी दिवस-रात्र झटणारे निवासी डॉक्टर स्वतःच मानसिक तणाव, वरिष्ठांकडून होणारा कथित छळ, प्रदीर्घ ड्युटी आणि शैक्षणिक दडपणामुळे नैराश्याच्या गर्तेत जात असल्याचे चित्र राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सातत्याने समोर येत आहे. काही वर्षांत आत्महत्येचे प्रयत्न, आत्महत्या, संप आणि आंदोलनांच्या घटना घडल्या असून, डॉक्टर डेच्या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टरांच्या कामाच्या परिस्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
राज्यातील निवासी डॉक्टरांना अनेकदा सलग २४ ते ४०, तर काही ठिकाणी ४८ तासांपर्यंत ड्युटी करावी लागते. रात्रपाळी संपल्यानंतरही ओपीडी, वॉर्ड, आपत्कालीन सेवा आणि शैक्षणिक कामे सुरूच राहतात. त्याचबरोबर थिसीस, परीक्षा आणि संशोधनाची जबाबदारीही पार पाडावी लागते. परिणामी शारीरिक थकव्याबरोबरच मानसिक ताणही प्रचंड वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
जेजेतील आत्महत्येच्या प्रयत्नाने पुन्हा प्रश्न ऐरणीवर
जेजे रुग्णालयातील बालरोग विभागातील अंतिम वर्षाच्या २८ वर्षीय निवासी डॉक्टरने १६ जुलै रोजी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मोठी खळबळ उडवणारी ठरली. सहकाऱ्यांनी तातडीने तिला आपत्कालीन विभागात दाखल करून जीव वाचवला.
आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी लिहिलेल्या पत्रात संबंधित डॉक्टरने विभागप्रमुखांचे नाव नमूद केल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर बालरोग विभागातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या निवासी डॉक्टरांनी विभागप्रमुखांविरोधात आंदोलन छेडले. विभागप्रमुखांकडून होणाऱ्या कथित मानसिक छळाबाबत विद्यार्थ्यांनी तक्रारी मांडल्या. मात्र, तक्रार केल्यास परीक्षेत नापास केले जाईल किंवा शिक्षणावर परिणाम होईल, या भीतीमुळे अनेक जण पुढे येत नसल्याचा आरोप करण्यात आला.
'वॉर्डमध्ये का गेलास, ओपीडीत का गेलास?' अशा प्रश्नांनी मानसिक दबाव
निवासी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, काही विभागांमध्ये वरिष्ठांकडून सतत अपमानास्पद वागणूक दिली जाते. वॉर्डमध्ये का गेलात, ओपीडीत का गेलात, अक्षर चांगले नाही, काहीच येत नाही अशा शब्दांत सुनावले जाते. रुग्णांसमोरच डॉक्टरांचा अपमान केला जातो. किरकोळ कारणांवर मेमो दिले जातात. कनिष्ठ डॉक्टरांसमोर वरिष्ठ डॉक्टरांनाही अपमानित केले जाते. अशा वातावरणामुळे कामाचा आत्मविश्वास कमी होत असल्याचे निवासी डॉक्टर सांगतात.
रोहन प्रजापती प्रकरणाने हादरले होते जेजे
जून २०२५ मध्ये जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टर रोहन प्रजापती याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात प्रथम श्रेणीतील विद्यार्थी असलेल्या रोहनला कोणतेही व्यसन नव्हते. तो अभ्यासात नेहमी अव्वल क्रमांकावर असायचा. त्याच्या अकाली मृत्यूने वैद्यकीय क्षेत्र हादरले होते. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीरपणे समोर आला.
त्वचा विभागातील निवासी डॉक्टरांचा ११ दिवसांचा संप
जेजे रुग्णालयातील त्वचा विभागातही निवासी डॉक्टरांनी डिसेंबर २०२४ मध्ये विभागप्रमुखांकडून होत असलेल्या कथित मानसिक छळाविरोधात सामूहिक रजा घेत ११ दिवस आंदोलन केले होते. परीक्षेत अनुत्तीर्ण करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्या वेळी करण्यात आला होता.
पुण्यातही निवासी डॉक्टरचा मृत्यू
जून २०२५ मध्ये पुण्यातील एका निवासी डॉक्टरचा वसतिगृहात मृत्यू झाल्याची घटना घडली. दीर्घकाळ खोलीचा दरवाजा न उघडल्याने संशय आल्यावर ही घटना उघडकीस आली. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांवरील मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
थिसीसवर सहीसाठी पैशांची मागणी?
निवासी डॉक्टरांकडून आणखी एक गंभीर आरोप करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी थिसीस सादर करणे आवश्यक असते. मात्र काही ठिकाणी विभागप्रमुखांकडून थिसीसवर सही करण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. "सही हवी असेल तर पैसे द्या," अशा अटी घातल्या जात असल्याचा आरोप काही निवासी डॉक्टरांनी केला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, मिरज, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि अंबेजोगाईसह अनेक ठिकाणी अशा तक्रारी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
१२ हजार निवासी डॉक्टरांवर आरोग्यसेवेची जबाबदारी
राज्यात सुमारे १२ हजारांहून अधिक निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. त्यापैकी सुमारे ८ हजार शासकीय व सेमी-शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, तर १२०० ते १५०० निवासी डॉक्टर डीम्ड विद्यापीठांमध्ये कार्यरत आहेत. राज्यातील शासकीय रुग्णालयांच्या आरोग्यसेवेचा मोठा भार याच निवासी डॉक्टरांवर असतो.
मानसिक आरोग्यासाठी उपाययोजनांची गरज
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, निवासी डॉक्टरांसाठी ठरावीक कामाचे तास, नियमित विश्रांती, स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा, वरिष्ठांकडून होणाऱ्या कथित छळावर कठोर कारवाई, समुपदेशन सुविधा आणि मानसिक आरोग्य सहाय्य उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन त्याचा थेट परिणाम आरोग्यसेवेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
डॉक्टर्स डेच्या निमित्ताने समाज जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करतो. मात्र, रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या या डॉक्टरांचे मानसिक आरोग्य, सुरक्षित कामाचे वातावरण आणि सन्मान जपण्याची जबाबदारीही शासन आणि वैद्यकीय संस्थांनी तितक्याच गांभीर्याने स्वीकारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सर्वेक्षणातील महत्त्वाचे निष्कर्ष
५३.२% निवासी डॉक्टरांची सलग ३६ तासांपेक्षा जास्त ड्युटी
८२.६% डॉक्टरांना पुरेशी झोप मिळत नाही
७८% डॉक्टर मानसिक व शारीरिक थकव्याने ग्रस्त
६१.५% डॉक्टरांनी कामाचा ताण "अत्यंत जास्त" असल्याचे सांगितले
४५.९% डॉक्टरांनी रेसिडेन्सी सोडण्याचा विचार केला
१६.५% डॉक्टरांच्या मनात आत्महत्येचे विचार आले
सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
सेंट्रल मार्ड आणि एफआयएमए यांनी जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील ३० शासकीय आणि १२ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील १०९ निवासी डॉक्टरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अहवालानुसार, ५३.२ टक्के निवासी डॉक्टर सलग ३६ तासांहून अधिक ड्युटी करतात, तर ८२.६ टक्के डॉक्टरांना पुरेशी झोप मिळत नाही. ७८ टक्के डॉक्टर मानसिक आणि शारीरिक थकव्याचा सामना करत आहेत, तर ६१.५ टक्के डॉक्टरांनी कामाचा ताण अत्यंत जास्त असल्याचे सांगितले आहे. या वाढत्या तणावामुळे ४५.९ टक्के निवासी डॉक्टरांनी रेसिडेन्सी सोडण्याचा विचार केला, तर सर्वात चिंताजनक बाब म्हणजे प्रत्येक सहा निवासी डॉक्टरांपैकी एक (१६.५ टक्के) डॉक्टरच्या मनात आत्महत्येचे विचार आल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
निवासी डॉक्टरांच्या तक्रारींचे वेळेत आणि निष्पक्ष निवारण करण्यासाठी प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात प्रभावी ग्रिव्हन्स कमिटी कार्यरत असणे गरजेचे आहे. या समित्यांमध्ये निवासी डॉक्टरांचे प्रतिनिधी, शिक्षक आणि प्रशासनाचा सहभाग असल्यास अशा तक्रारींचे योग्य निराकरण होऊ शकते."डाॅ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, जे जे रुग्णालय
देशातील निवासी डॉक्टर अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत काम करत आहेत. आरोग्यसेवेचा दर्जा उंचावायचा असेल तर त्यांच्या कामकाजाच्या परिस्थितीत तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे.डॉ. अथर्व शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र सेंट्रल मार्ड.
"निवासी डॉक्टरांकडून सलग २४ ते ३६ तास इमर्जन्सी ड्युटी करून घेतली जाते. मात्र पोस्ट-इमर्जन्सीनंतर विश्रांतीची कोणतीही व्यवस्था नाही. विद्यापीठाच्या नियमांनुसार अभ्यासासाठी एक महिना मिळणे अपेक्षित असतानाही अनेक ठिकाणी परीक्षा देण्यासाठीही वेळ मिळत नाही. याशिवाय क्लास-३ आणि क्लास-४ कर्मचाऱ्यांची कामेही निवासी डॉक्टरांकडून करून घेतली जातात. दीर्घ कामाचे तास, मनुष्यबळाची कमतरता आणि प्रशासकीय त्रुटींमुळे निवासी डॉक्टरांवर प्रचंड मानसिक ताण निर्माण होत असून या प्रश्नांकडे सरकार आणि वैद्यकीय प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे."डाॅ विनायक शहा, सदस्य सेंट्रल मार्ड