मुंबई: शिवसेना ठाकरे गटातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या ६ खासदारांच्या हालचालींना वेग आला आहे. लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाची मागणी केल्याची चर्चा असताना आता हे सर्व खासदार आपापल्या मतदारसंघात जाऊन आपली भूमिका मांडणार आहेत.
मतदारसंघातील विकासकामे, रखडलेला निधी आणि स्थानिक जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच आपण हा निर्णय घेत असल्याचे या खासदारांचे म्हणणे असून, ते पुढील दोन दिवसांत स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट चर्चा करणार आहेत.
विकासकामांसाठी शिंदे गटाचा पर्याय
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोरीच्या तयारीत असलेल्या या खासदारांनी ठाकरे गटातील संवादाचा अभाव आणि मतदारसंघासाठी विकास निधीच्या तुटवड्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 'खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघाचा विकास करणे, हे आमचे पहिले कर्तव्य आहे.
महायुती सरकारच्या माध्यमातूनच स्थानिक प्रकल्पांना गती मिळू शकते आणि विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळेच मतदारसंघाच्या हितासाठी आम्ही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे,' अशी भूमिका या खासदारांनी मांडली आहे.
कार्यकर्त्यांची मनधरणी आणि बैठकांचे सत्र
खासदार जरी शिंदे गटात जाण्यास तयार असले, तरी स्थानिक पातळीवरील तळागाळातील कार्यकर्ता आणि मतदार ठाकरे गटासोबत राहू नये, यासाठी हे खासदार विशेष प्रयत्न करत आहेत.
मतदारसंघात परतल्यानंतर हे नेते प्रमुख पदाधिकारी, जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्त्यांच्या विशेष बैठका घेणार आहेत. आपण घेतलेला निर्णय वैयक्तिक स्वार्थासाठी नसून मतदारसंघाच्या भल्यासाठी कसा योग्य आहे, हे ते पटवून देणार आहेत. या संवाद दौऱ्यानंतरच त्यांचे शक्तिप्रदर्शन आणि अधिकृत पक्षप्रवेश होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेशाच्या तयारीत असलेले ६ बंडखोर खासदार
१. संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई), २. ओमप्रकाश ऊर्फ ओमराजे निंबाळकर (धाराशिव), ३. संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), ४. संजय जाधव (परभणी), ५. नागेश आष्टीकर-पाटील (हिंगोली), ६. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी).