मुंबई वगळता इतर ठिकाणी रिपाइंचा महायुतीला पाठिंबा  file photo
मुंबई

Ramdas Athawale : मुंबई वगळता इतर ठिकाणी रिपाइंचा महायुतीला पाठिंबा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः भाजपने मुंबईत कोणत्याही जागा न सोडल्याने रिपाइंने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, भाजपशी मैत्रीपूर्ण लढती होतील असे सांगत अन्य सर्वत्र महायुतीला रिपाइंचा पाठिंबा असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी घोषित केले. महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. जेथे महायुतीचे एकत्रित उमेदवार आहेत तेथे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजप व शिंदे सेनेचे उमेदवार समोरासमोर उभ्या असलेल्या वार्डांमधील रिपाइंची भूमिका मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मुंबईत एकत्र जागावाटप झाले तरी रिपाइंला जागा मिळाल्या नाहीत. याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात होती. ती दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास आठवले यांच्या स्वतंत्र बैठकाही घेतल्या. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नसल्याचे स्पष्ट होते आहे. ठाणे येथेही रामदास आठवले यांना युतीचा भाग व्हायचे होते; परंतु त्यांच्यासाठी वेगळ्या जागा देणे शक्य झाले नाही. मुंबईत दलित-मुस्लिम मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची शक्यता आहे. काँग्रेस-वंचित एकत्रपणे निवडणुकांना सामोरे जात आहेत, तर ठाकरे बंधूंनाही विशेषतः उद्धव ठाकरे यांना दलित मते मिळतील असे वाटते आहे. या तिहेरी लढतीत भाजपला रिपब्लिकन पक्षासाठी स्वतंत्रपणे जागा देणे उचित वाटले नसावे. तथापि, जागावाटप योग्यप्रकारे झाले नसले तरी आमची युती अभंग आहे. युतीत जिंकून येईल, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT