Rajya Sabha Election 2026 |
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि. १८) राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रासोबतच ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या 16 मार्च 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : ५ मार्च २०२६
अर्जांची छाननी : ६ मार्च २०२६
अर्ज मागे घेण्याची मुदत : ९ मार्च २०२६
मतदान दिनांक : १६ मार्च २०२६ (सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत)
मतमोजणी : १६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपासून
महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले सात महत्त्वाचे सदस्य निवृत्त होत असल्याने या जागा रिक्त होत आहेत. यामध्ये शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट)), रामदास आठवले (आरपीआय - भाजप मित्रपक्ष), फौजिया खान (राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट)), रजनी पाटील (काँग्रेस), प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), धैर्यशील पाटील (भाजप), भागवत कराड (भाजप)
राज्यातून राज्यसभेवरील कार्यकाळ संपलेल्या रामदास आठवले यांचे पुन्हा राज्यसभेत येणे निश्चित मानले जाते, तर शरद पवार पुन्हा राज्यसभेत येणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
प्रियंका चतुर्वेदी आणि फौजिया खान यांच्या पक्षाकडे त्यांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. काँग्रेस नेत्या रजनी पाटील इतर राज्यातून राज्यसभेवर येणार का आणि भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या बाबतीत भाजप काय भूमिका घेणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या विशेष जांभळ्या स्केच पेनचाच वापर करणे बंधनकारक असेल असे आयोगाने स्पष्ट केले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 20 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.