Raj Thackeray on CJP Student Protest: देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, सत्तेवर असणाऱ्यांनी केवळ अधिकारच नव्हे तर अपयशाची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे, असे ते म्हणाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवतीर्थ येथील निवासस्थानी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर भाष्य केले.
राज ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून देशभरात विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. सुरुवातीला हे आंदोलन शांततापूर्ण होते, मात्र त्यानंतर आंदोलनकर्त्यांवर दबाव आणण्याचे आणि आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांवरील कारवाईचे पडसाद देशभर उमटत असून महाराष्ट्र आणि मुंबईतही त्याचे परिणाम दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य करत सांगितले की, कोणत्याही पदाची जबाबदारी स्वीकारताना त्या पदाशी संबंधित यशाबरोबरच अपयशाची जबाबदारीही स्वीकारावी लागते. विद्यार्थ्यांचीही हीच मागणी असून संबंधित प्रकरणाची नैतिक जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पूर्वीच्या काही घटनांचा उल्लेख करत, विरोधी पक्षात असताना भाजपने विविध प्रकरणांमध्ये मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, अशी आठवण करून दिली.
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली. जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तींनी परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी परीक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले. परीक्षा पूर्णपणे केंद्रीकृत पद्धतीने घेण्याबाबत त्यांनी पूर्वीच आक्षेप घेतला होता, असा दावा त्यांनी केला. मात्र, सत्तेच्या अहंकारामुळे त्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे ते म्हणाले. त्यांच्या मते, आजचा वाद केवळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित राहिलेला नसून तो केंद्र सरकारच्या नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे.
राज ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या अलीकडील प्रतिक्रियेचाही उल्लेख करत, केवळ सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावून त्यांची भूमिका समजून घेतली असती, तर परिस्थिती इतकी चिघळली नसती, असे मत व्यक्त केले.
लोकांच्या भावना समजून घेण्याऐवजी आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. लोकांचं ऐकण्याची तयारी नसणे हा सत्तेचा अहंकार असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून या विषयावर देशातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.