Raj Thackeray Devendra Fadnavis meeting
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी पोहोचले असून दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. विशेष म्हणजे, ही भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर राज ठाकरे यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहे.
झारखंडची राजधानी रांची येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या तरुण-तरुणी आणि विद्यार्थ्यांवर तेथील सरकारने केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यावर उद्धव आणि राज ठाकरे यांची बोलती का बंद आहे, असा प्रश्न मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी केला. झारखंडमध्ये काँग्रेस सत्तेत सहभागी असल्यानेच या दोन्ही नेत्यांनी मौन बाळगले असून स्वतःच्या राजकीय सोयीची भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
रांची येथे नोकरभरतीतील गैरव्यवहाराच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलकांवर तेथील प्रशासनाने अत्यंत क्रूरपणे बळाचा वापर केला. रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला करणारे हे विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीतीलच हल्लेखोर आहेत. यामुळे काँग्रेसला आता देशाला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. काँग्रेस आणि राहुल गांधी यांची या संपूर्ण प्रकरणात दुटप्पी भूमिका उघडी पडली आहे, असे शेलार म्हणाले.
तिथे झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) सोबत काँग्रेसही सत्तेत समान वाटेकरी आहे. मग हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्यासाठी अमानुष बळाचा वापर कोणाच्या इशाऱ्यावर झाला, राहुल गांधी आता तिथल्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेणार की स्वतः आपल्या पदाचा राजीनामा देणार, असा सवालही त्यांनी केला.
रांचीमध्ये ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, ते तरुण-तरुणी आणि विद्यार्थी आपले नाहीत का? महाराष्ट्रात प्रत्येक लहान-मोठ्या मुद्द्यावर बोलणाऱ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे दरवाजे या प्रकरणात का बंद आहेत? विरोधकांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताचा बळी देऊन आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचे काम केले आहे. हेच त्यांचे मूळ धोरण असल्याने सध्या संसदेतही विरोधकांकडून 'नौटंकी' आणि गोंधळ घालण्याचे काम सुरू आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना रांचीचे विमानाचे तिकीट काढून पाठवायला तयार आहोत, त्यांनी तिथल्या पीडित विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून दाखवावे, असे आव्हानही शेलार यांनी दिले.