Raj Thackeray letter to Devendra Fadnavis file photo
मुंबई

Raj Thackeray: महाराष्ट्र हादरला! मुलं पळवण्याचं प्रमाण ३०% वाढलं; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याच्या आणि बेपत्ता होण्याच्या वाढत्या गंभीर समस्येकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.

मोहन कारंडे

Raj Thackeray letter to Devendra Fadnavis

मुंबई: महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याच्या आणि बेपत्ता होण्याच्या वाढत्या गंभीर समस्येकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात राज ठाकरेंनी या संकटाची आकडेवारी देत, राज्य सरकारने ठोस आणि कठोर पाऊले उचलण्याची मागणी केली आहे.

राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलं आहे?

राज ठाकरे यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या आकडेवारीचा हवाला देत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रात नमूद केलं आहे की, महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३० टक्क्यांनी वाढले आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार काय कारवाई करत आहे हे समजत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भीक मागणाऱ्यांची डीएनए चाचणी करा

केवळ 'अमुक केसेस दाखल झाल्या आणि इतकी टक्के मुलं सुखरूप परत मिळाली' अशा सरकारी उत्तराची महाराष्ट्राला अपेक्षा नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. या समस्येवर त्वरित कृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर भीक मागणाऱ्या लहान मुलांची गंभीर दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. "या मुलांसोबत असलेले लोक त्यांचे खरे आई-वडील आहेत की नाही, याचा तपास किंवा वेळ पडल्यास डीएनए चाचणी करावी," असे आदेश देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

विधिमंडळ अधिवेशनावर टीका

राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत, यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का? असा सवाल ठाकरे यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली, अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल, अशी अपेक्षा करणे पण अवाजवी वाटेल, अशी परिस्थिती आहे. केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT