मुंबई: आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रश्नांची सरबत्ती करत टीका केली. नैतिक आवाहनांचा भार जनतेवर टाकण्यापेक्षा आपली अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झाल्याचे मान्य करा, असा टोलाही त्यांनी लगावला.
चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का? असा प्रश्न राज यांनी केला. तुमची मन की बात खूप झाली, आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ज्ञांची मन की बातपण ऐका. संसदेचे एक विशेष अधिवेशन घ्या आणि यावर सगळ्यांना उत्तर द्या, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली आहे.
पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरू करावी आणि हे सगळे कसे निस्तरणार हे देशाला सांगावे, असेही ठाकरे म्हणाले.
लाडकी बहीणमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस
साऱ्या निवडणुका ‘रेवड्या’ वाटूनच जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचे सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे, तर या ‘रेवड्या’ वाटू नका, असे पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का? असा प्रश्नही राज यांनी केला.