Raj Thackeray Clarification On Meeting with Eknath Shinde: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे आपली राजकीय भूमिका बदलणार का आणि ते शिंदे गटासोबत जुळवून घेणार का अशी राजकीय चर्चा सुरू झाली होती. त्यातच आज मनसे नगरसेवक आणि पदाधिकारी यांची बैठक रंगशादरामध्ये आयोजित केली होती. त्यामुळं राजकीय चर्चेला उधाण आलं होतं.
मात्र आज पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागचे कारण स्पष्ट केलं. त्यांनी स्पष्टीकरण देताना प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टीकोणातून पाहणे गरजेचं नाही. आता निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळं आघाड्या अन् जुळवाजुळवी देखील संपुष्टात आली आहे. आपल्याकडे आता निकोप राजकारण राहिलेलं नाही असं देखील वक्तव्य केलं.
राज ठाकरे यांना कालच्या एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या बैठकीबाबत विचारले असता राज ठाकरे म्हणाले, 'काय आहे सध्या आपल्याकडे पूर्वीसारखं निकोप राजकारण राहिलेलं नाही. कोणी एकमेकांना भेटणं यामधून प्रत्येकवेळी राजकारण शोधायचं यातून युत्या आघाड्या चर्चा करायची. एक तर तीन वर्षानं निवडणुका आहेत. आता तर तशी काही परिस्थिती नाही. निवडणुका संपलेल्या आहेत आता. आज ते सत्तेवरती आहेत. आम्हाला जर काही सुचना करायच्या असतील तर, चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर भेट व्हायला नको?'
राज ठाकरे पुढं म्हणाले की, 'प्रत्येकवेळी अशा गोष्टीतून राजकारण शोधलं पाहिजे असं काही नाही. उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटेन. आज महाराष्ट्रात, पुण्यात, मुंबईत, ठाण्यात अनेक प्रश्न आहेत. जे आम्हाला वाटतात ते प्रश्न आम्ही सांगणं गरजेचं नाही का? जर त्या दिवशी तुम्ही तिथं असता तर त्याच दिवशी मी बोललो असतो.'
'मी परवा त्यांना भेटलो कारण आपल्या शहरांची अवस्था इतकी भीषण, विचित्र आणि बिकट स्थितीला पोहचली आहे. आपण फक्त रस्ते, फ्लाय ओव्हर आणि पूर बांधणं याला विकास म्हणतो. मात्र ती फक्त सूज आहे. आपण मूळ गोष्टींना हात घालत नाही. आपल्या सर्व शहरांमध्ये रिडेव्हलपमेंट सुरू आहे. आधी ४० माणसं रहात होती आता तिथं ४०० माणसं रहात आहेत. मात्र जागा तेवढीच आहे.'
शहरातील ट्रॅफिकच्या प्रश्नाबाबत राज ठाकरे यांनी सांगितलं की, 'अनेकांकडे अनेक गाड्या आहेत त्या पार्किंगमध्ये न जाता रस्त्यावर आल्या आहेत. नागरिक म्हणून यात मी पण आलो. मी काही वेगळा नाहीये. मात्र या सर्व गोष्टींना कुठंतरी शिस्त आली पाहिजे. सध्या ट्रॅफिकची खूप समस्या आहे. येणारी माणसं थांबत नाहीयेत. गाड्यांची संख्या थांबत नाहीये. सगळीकडे जाम होतं. हीच गोष्ट मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितली होती. हीच गोष्ट मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कानावर घातली. त्यांनी ताबडतोब भूषण गगराणी यांना फोन करून त्यांना सांगितलं की काय करायल हवं याची सुचना दिली.'
मी हे सगळं सांगितलं मात्र आपल्याकडं नाही या बैठकीत काहीतरी असणार असं वाटतं. असणार तर तुम्हाला काय चर्चा करत बसायची असेल ती करत बसा. मी याबाबतची फाईल त्यांना दिली ती गगराणींकडे गेली आहे. याबाबत पुढं काय झालं हे गगराणींना विचारा.