मुंबई: पुण्यात गेल्या पाच वर्षांमध्ये (२०२१ ते २०२५) ४.२८ लाख घरांची विक्री झाली आहे. मुंबई आणि चेन्नईच्या एकत्रित घरांच्या विक्रीलाही या कालावधीत पुण्याने मागे टाकले असून, हैदराबादपेक्षा ३७ टक्के अधिक घरांची विक्री पुण्याने नोंदविली आहे. त्यामुळे पुणे भारतातील गृहक्षेत्राची राजधानी ठरली आहे.
क्रेडाई पुणे आणि सीआरई मॅट्रिक्स यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या 'पुणे हाऊसिंग रिपोर्ट’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. गत पाच वर्षांत पुण्यामध्ये सरासरी दर सहा मिनिटांनी एका घराची विक्री झाली आहे. भारतातील अग्रगण्य निवासी स्थावर मालमत्ता बाजारपेठ म्हणून पुण्याचे स्थान अधिक बळकट झाले आहे.
मजबूत आर्थिक पायावर उभी असलेली शहराची अर्थव्यवस्था, ग्राहकांची मागणी यामुळे शहरातील घरांना चांगली मागणी आहे. विशेषतः माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्र, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी), वाहन उत्पादन उद्योग तसेच संबंधित उद्योगांचा सातत्याने होत असलेला विस्तार रोजगारनिर्मितीला चालना देत आहे. त्यामुळे देशभरातील कुशल व्यावसायिक पुण्याकडे आकर्षित होत असून, गृहनिर्माण क्षेत्रातील मागणी सातत्याने वाढत आहे.
प्रशस्त घरांची मागणी वाढली
जानवेरी ते जून २०२६ दरम्यान विकल्या गेलेल्या घरांपैकी २६ टक्के घरे एक कोटी रुपयांपेक्षा अधिकची आहेत. यावरून प्रीमियम गृहनिर्माणाकडे ग्राहकांचा असलेला वाढता कल लक्षात येतो. त्याचवेळी, सुमारे ७४ टक्के घरे अद्याप एक कोटीपेक्षा कमी किमतीत विकली गेली आहेत. भारतातील सर्वाधिक परवडणाऱ्या महानगरांपैकी एक म्हणून पुण्याने आपले स्थान कायम राखले आहे.
महाराष्ट्राच्या नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातील नोंदीनुसार पुणे शहरात जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत पुण्यात ३७ हजार ४८ कोटी रुपये मूल्याच्या घरांची विक्री झाली आहे. क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन म्हणाले, प्रीमियम गृहनिर्माण क्षेत्रातील सातत्यपूर्ण वाढ खरेदीदार अधिक दर्जेदार जीवनशैलीकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट करते. याशिवाय आयटी क्षेत्र, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी) आणि वाहन उद्योगाच्या सातत्यपूर्ण विस्तारामुळे पुण्याचा निवासी गृहनिर्माण बाजार दीर्घकालीन विकासासाठी सक्षम स्थितीत आहे.
शहरातील घरांचे सरासरी मूल्य ८४ लाखांवर
पुण्यातील निवासी मालमत्तांच्या किमतींमध्येही सातत्याने वाढ होत असून, विकल्या गेलेल्या घरांचे सरासरी मूल्य ८४ लाख रुपयांवर पोहोचले आहे, तर २०२२च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत त्यामध्ये ३८ टक्क्यांची वाढ झाली आहे. याच कालावधीत निवासी व्यवहारांचे एकूण मूल्य ४२ टक्क्यांनी वाढले आहे. तसेच, प्रतिचौरस फुटाच्या सरासरी किमतीतही २० टक्क्यांची वाढ झाली आहे.