Jayant Narlikar Passed Away  File Photo
मुंबई

'बिगबँग थिअरी' मागचा गुरू... राज ठाकरे यांनी नारळीकरांच्या कार्याला दिला उजाळा !

Jayant Narlikar Passed Away | भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक प्रा. जयंत नारळीकर यांचे पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी आज (दि. २०) निधन झाले

मोनिका क्षीरसागर

Astronomer Jayant Narlikar Passed Away

मुंबई : प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक प्रा. जयंत नारळीकर यांनी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी आज (दि. २०) अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली, ते ८६ वर्षांचे होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील एक्स पोस्टवरून नारळीकर यांच्या कार्याला उजाळा देत, श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांनी बिगबँग थिअरीलाच आव्हान दिले, त्यामुळे...

राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं आज निधन झालं. १९६४ साली वयाच्या २६ व्या वर्षी एका तरुण मराठी शास्त्रज्ञाने आपले गुरु फ्रेड हॉयल यांच्या सोबत गुरुत्वाकर्षणाचा नवा सिद्धांत मांडला आणि यातून विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील संशोधनाला चालना मिळाली. त्यावेळेस बिगबँग थिअरी ही प्रचलित आणि सर्वमान्य थिअरी होती पण त्यालाच नारळीकरांनी आवाहन दिलं आणि यातूनच विश्वनिर्मितीच्या बाबत अनेक नव्या शक्यता आज देखील तपासून बघितल्या जात आहेत".

हे माणसाला पडलेले मूलभूत प्रश्न

आपण कोण?, कुठून आलो?, ही सृष्टी कोणी? आणि कशी निर्माण केली? हे माणसाला पडलेले मूलभूत प्रश्न आहेत ज्यावर अनेक शतकं विचार सुरु आहे. सुरुवातीला जेंव्हा कुठलंच सज्जड उत्तर सापडलं नाही तेंव्हा ही सृष्टी कुठल्यातरी शक्तीने घडवली असं मानलं गेलं, आणि हे काही भारतातच नाही तर जगभरात मानलं गेलं. मग या सृष्टीच्या नियंताचा शोध घ्या, त्याचे पृथ्वीवरील स्वघोषित दूत आले आणि त्यातून जगभरात शोषणाची एक लाटच आली होती, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

म्हणूनच आज जग AI च्या उंबरठ्यावर

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, "युरोपात रेनिसन्सचा काळ आला आणि ज्यातून सगळ्याच कल्पनांना आवाहन दिलं गेलं. अर्थात त्यासाठी शास्त्रज्ञांना तत्कालीन धर्मसत्ता आणि कधी कधी राजसत्तेकडून प्रचंड अहवेलना सहन करावी लागली. पण त्यांची चिकाटी संपली नाही. आणि म्हणूनच आज जग ज्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उंबरठ्यावर आहे तिथे पोहचु शकला".

असं राजकारणात कधी होईल कोण जाणे?; राज ठाकरेंकडून विज्ञान आणि राजकारणाची तुलना

डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या गुरूंनी विज्ञानाच्याच अशा एका कल्पनेला आवाहन दिलं आणि एक नवा सिद्धांत मांडला. विज्ञानात एक बरं असतं की एखाद्याने एखादी थिअरी खोडून काढली म्हणून कोणी कोणाच्या अंगावर धावून जात नाही, उलट नव्या प्रेरणेने त्याचा विचार सुरु होतो. असं राजकारणात कधी होईल कोण जाणे. असो", सध्याचे राजकारण आणि विज्ञान याची तुलना देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

त्यांच्या दोन गोष्टी मला खूपच लक्षणीय वाटतात; राज ठाकरे

राज ठाकरे पुढे म्हणाले, "डॉ. नारळीकर हे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ होतेच पण त्यांच्या बाबतीत दोन गोष्टी मला खूपच लक्षणीय वाटतात. एक म्हणजे आयुका सारखी संस्था जिथे खगोलशास्त्र आणि खगोलभौतिक शास्त्रावर मूलभूत संशोधन केलं जातं. डॉ. नारळीकर जेव्हा १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात परतले तो काळ असा होता जेव्हा विज्ञानातील मूलभूत संशोधनातील संस्था उभ्या राहत होत्या. स्वतः नारळीकर टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कार्यरत होते, त्यामुळे कदाचित त्यांना तिथून प्रेरणा मिळाली असावी. आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं आणि त्यांनी तेंव्हा उभ्या केलेल्या संस्था यांचं अप्रुप वाटतं".

विज्ञानाला साखरेचं कोटिंग देणारे सिद्धहस्त लेखक, शास्त्रज्ञ

"डॉ. नारळीकरांची ते उत्तम विज्ञान कथा लेखक होते ही दुसरी ओळख. अमेरिकेत, युरोपात विज्ञानकथांचं आणि त्यातून निघणाऱ्या चित्रपटांचं एक खूप मोठं प्रस्थ आहे. अनेकांना त्याची फारशी गोडी नसते , पण नारळीकरांनी मात्र मराठी जनांना विज्ञानकथेची गोडी लावली. नारळीकर स्वतःच म्हणायचे की 'विज्ञानाची गोळी कडू लागत असेल तर त्याला साखरेचं कोटिंग म्हणजे कथेचं रूप देणं चांगलं. 'विज्ञानाला साखरेचं कोटिंग देणारे सिद्धहस्त लेखक, शास्त्रज्ञ आज आपल्यातून गेले. अशा माणसांची उणीव नक्की भासेल आणि महाराष्ट्राला तर नक्कीच, असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जयंत नारळीकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT