मुंबई: यावर्षीच्या प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात काँग्रेसच्या अमीन पटेल, अस्लम शेख, ज्योती गायकवाड या तीन आमदारांनी अव्वल स्थान पटकावले आहे, तर ठाकरे गटाचे सुनील प्रभू आणि मनोज जामसूतकर पहिल्या पाच क्रमांकात आले आहेत, तर दुसरीकडे सत्तारूढ भाजप आणि शिंदे गटाच्या पाच आमदारांची निकृष्ट कामगिरी असून यांचे क्रमांक तळाला आहेत.
विधानसभेतील उपस्थिती, जनसामान्यांचे विचारलेले प्रश्न, शिक्षण आदी निकष लावून प्रजा फाऊंडेशनच्या वतीने मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा अहवाल तयार केला जातो.
मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा रिपोर्ट प्रजा फाऊंडेशनच्या वतीने बनविण्यात येतो. सभागृहातील उपस्थिती, विधानसभेत मांडलेले प्रश्न, शिक्षण आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी याबाबतच्या माहितीच्या आधारे उत्कृष्ट कामगिरी करणारे अव्वल पाच आमदार आणि निकृष्ट कामगिरी करणारे तळाचे पाच आमदार असा अहवाल जाहीर करण्यात आला आहे.
मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल यांनी ८२ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर मालाडचे आमदार अस्लम शेख यांनी ८०.५८ टक्के आणि धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी ८०.३० टक्के मिळवून अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. चौथा क्रमांक ठाकरे गटाचे दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांनी, तर पाचवा नंबर भायखळ्याचे आमदार मनोज जामसूतकर यांनी मिळविला आहे.
शिंदे गटाचे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी २८ टक्के मिळवून निकृष्ट दर्जाच्या कामगिरीत पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर निकृष्ट दर्जाच्या कामगिरीत दुसरा क्रमांक भांडुपचे शिंदे गटाचे आमदार अशोक पाटील यांचा आहे, तर निकृष्ट दर्जाच्या कामगिरीत तिसरा क्रमांक घाटकोपरचे भाजपचे आमदार राम कदम यांचा आहे, तर चौथा क्रमांक चांदिवलीचे शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांचा आहे.
निकृष्ट दर्जाच्या कामगिरीत पाचवा क्रमांक भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा आहे. भाजप आणि शिंदे गटाची सत्ता असतानाही त्यांच्या एकाही आमदाराला अव्वल कामगिरीच्या पहिल्या पाच क्रमांकांत स्थान मिळवता आलेले नाही.