Mumbai Pune Amrit Bharat Express: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या नव्या रेल्वे सेवांमुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होणार असून प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी स्वस्त आणि आरामदायी पर्याय उपलब्ध होणार आहे.
आज सुरू होणाऱ्या दोन महत्त्वाच्या गाड्यांमध्ये बनारस–पुणे अमृत भारत एक्सप्रेस आणि अयोध्या–मुंबई अमृत भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. धार्मिक पर्यटन, व्यवसायिक प्रवास आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी या गाड्या महत्त्वाच्या आहेत.
ही गाडी बनारस ते हडपसर (पुणे) दरम्यान धावणार आहे. ही गाडी तब्बल 20 स्थानकांवर थांबणार आहे. उत्तर भारतातून पुण्याकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या गाडीचे प्रमुख थांबे बनारस, प्रयागराज जंक्शन, झाशी, राणी कमलापती, इटारसी, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड आणि हडपसर असे असतील.
या मार्गामुळे पुणे आणि उत्तर प्रदेश यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होईल. विशेषतः काशी विश्वनाथ धामला जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा उपयुक्त आहे.
दुसरी गाडी अयोध्या धाम जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणार आहे. या मार्गावर 14 महत्त्वाचे थांबे असतील. या गाडीचे प्रमुख थांबे अयोध्या धाम, सुलतानपूर, प्रतापगड, प्रयागराज, सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस असतील.
अयोध्येतील श्रीराम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांसाठी ही गाडी महत्त्वाची असणार आहे. मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
या नव्या रेल्वे सेवांमुळे प्रवाशांना वारंवार ट्रेन बदलण्याची गरज नाही. प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होईल. तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रेल्वे मार्गांमुळे व्यापार, उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होण्याची शक्यता आहे. विशेषतः धार्मिक पर्यटन वाढल्याने स्थानिक व्यवसायांना मोठा फायदा होऊ शकतो. भारतीय रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या या नव्या अमृत भारत एक्सप्रेस सेवा देशातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.