मुंबई : पदविका अभ्यासक्रमांच्या ७१ आणि पदवी अभ्यासक्रमांच्या १८ फार्मसी संस्थांना पीसीआयने घालून दिलेल्या अटी न पूर्ण केल्याने प्रवेश बंदी घातली आहे. यामुळे वारेमाप वाढलेल्या राज्यातील फार्मसी जागांमध्ये लक्षणीय घट होणार आहे.
राज्यातील फार्मसी प्रवेश प्रक्रियेचा नोंदणीचा टप्पा पूर्ण झाला असला तरी प्रत्यक्ष अजून प्रवेश सुरु झालेले नाहीत. या अगोदरच आता पीसीआयने या संस्थांचे पहिल्या वर्षीचे प्रवेश थांबवले आहेत.
यंदा बॅचलर ऑफ फार्मसी (बी. फार्म) पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा ५४ हजार ९२१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, तर डिप्लोमा इन फार्मसी (डी. फार्म) पदविकासाठी ३३ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदवले आहे. या आठवड्यात पदवी प्रवेशाला प्रत्यक्षपणे सुरुवात होणार आहे.
गेल्या चार वर्षांपूर्वी कोरोना काळात फार्मसी अभ्यासक्रमातील प्रवेशात मोठी वाढ झाली होती. त्या काळात अनेक नव्या महाविद्यालयांनी मान्यतेसाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाला (पीसीआय) अर्ज पाठवला होता. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत पीसीआयने पदविका अभ्यासक्रमासाठी २२० आणि पदवी अभ्यासक्रमासाठी ९२ नव्या
महाविद्यालयांना परवानगी दिली होती. यामुळे राज्यात वारेमाप संस्था वाढल्या होत्या. मात्र प्रवेश कमी झालेले दिसून आले. यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने या संस्थांची गुणवत्ता आणि मानक पूर्ण होत आहेत का, याची सखोल पाहणी केली.
या तपासणीत धक्कादायक तथ्य समोर आले. पदविका अभ्यासक्रमाच्या २२० पैकी १२८ संस्था म्हणजे जवळपास ६० टक्के संस्था पीसीआयच्या निकष पूर्ण करत नसल्याचे आढळले. प्रमुख कारणांमध्ये अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नसणे, भोगवटा प्रमाणपत्र नसणे, प्रयोगशाळा कमी असणे आणि कर्मचाऱ्यांची संख्या निकषांपेक्षा कमी असणे या गोष्टींचा समावेश होता. विशेष म्हणजे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नसलेल्या संस्थांची संख्याही मोठी होती. या समस्यांवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पीसीआयला कळवले.
यानंतर पीसीआयने या अहवालाची दखल घेत ८९ अशा संस्थांना यंदाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी यंदा उपलब्ध जागांमध्ये मोठा फरक निर्माण होणार आहे. यामुळे यंदा रिक्त जागांचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.