Mumbai Water Crisis Viral Video Pudhari
मुंबई

Mumbai Water Crisis: महिन्याला 90 हजार भाडे, तरी पाण्यासाठी संघर्ष; मुंबईकरच्या VIDEOने उघड केले धक्कादायक वास्तव

Mumbai Water Crisis Viral Video: मुंबईतील एका रहिवाशाने महिन्याला 90 हजार भाडे भरूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा दावा केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Water Crisis Viral Video: मुंबईत घरभाड्याचे दर किती प्रचंड आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र लाखो रुपये खर्च करूनही जर मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर? अशाच एका मुंबईकरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यातून मुंबईतील पाणीटंचाई आणि शहरी पायाभूत सुविधांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

इन्स्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये निखिल नावाच्या तरुणाने आपल्या सोसायटीतील पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा दावा आहे की तो ज्या उच्चभ्रू ठिकाणी राहतो, तेथे महिन्याचे भाडे 70 हजार रुपयांपासून सुरू होते, तर तो स्वतः तब्बल 90 हजार रुपये भाडे भरतो. तरीही रहिवाशांना नियमित पाणी मिळत नाही.

उंच टॉवर, मोठे भाडे; पण पाण्याची चिंता

निखिलने सांगितले की, त्याच्या सोसायटीत दोन उंच टॉवर्स आहेत आणि प्रत्येक टॉवरमध्ये 37 मजले आहेत. शेकडो कुटुंबे या सोसायटीत राहतात. एवढ्या मोठ्या सोसायटीतही पाण्याचा पुरवठा होत नाही.

त्याच्या म्हणण्यानुसार, पाणी कधीही अचानक बंद होते आणि रहिवाशांना सोसायटीकडून मागवण्यात येणाऱ्या खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागते. मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी टँकर हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही, असे त्याने नमूद केले.

महागडे भाडे, पण पाण्याचा काटकसरीने वापर

व्हिडिओमध्ये निखिलने सांगितले की, मोठे भाडे भरूनही रहिवाशांना पाण्याचा वापर जपून करावा लागतो. काहीवेळा रात्री उशिरा पाणीपुरवठा बंद होतो, त्यामुळे स्वयंपाक, स्वच्छता आणि दैनंदिन कामांमध्ये अडचणी निर्माण होतात.

"महिन्याला इतके भाडे भरूनही पाणी वापरताना दोनदा विचार करावा लागतो, यापेक्षा दुर्दैव काय असू शकते?" असा सवाल त्याने व्हिडिओमध्ये उपस्थित केला.

त्याने असेही म्हटले की, आपत्कालीन परिस्थितीत पाणीपुरवठा अचानक बंद झाला, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी मुंबईतील वास्तव अधोरेखित करणारी ही घटना असल्याचे म्हटले. "मुंबईत लोक प्रचंड पैसे मोजतात, पण मूलभूत सुविधांसाठी अजूनही संघर्ष करावा लागतो," अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर काहींनी एवढे महागडे भाडे आकारणाऱ्या सोसायटीत पाण्याची समस्या कशी असू शकते, असा प्रश्न उपस्थित केला.

केवळ एका सोसायटीचा प्रश्न नाही?

अनेक सोशल मीडिया युजर्सनी ही समस्या केवळ एका सोसायटीपुरती मर्यादित नसल्याचे म्हटले आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये वाढती लोकसंख्या, अपुऱ्या पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापनातील त्रुटी आणि टँकरवरील वाढते अवलंबित्व यामुळे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

विशेषतः उंच निवासी प्रकल्पांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यानुसार पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांची क्षमता वाढत नसल्याचा मुद्दाही चर्चेत आला आहे.

मुंबईच्या विकास मॉडेलवर प्रश्नचिन्ह

या व्हिडिओनंतर अनेकांनी मुंबईच्या शहरी विकास मॉडेलवर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या शहरात लाखो रुपये खर्च करूनही नागरिकांना पाण्यासारख्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

एका व्हायरल व्हिडिओने पुन्हा एकदा मुंबईतील पाणी व्यवस्थापन, नागरी नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या वास्तवाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता या चर्चेतून प्रशासन आणि संबंधित यंत्रणा काही ठोस पावले उचलतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT