स्वप्निल कुलकर्णी
मुंबई: आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या चार दिवसांवर आल्याने पंढरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. आषाढीसाठी पंढरपुरातील फुलांची बाजारपेठ सजली असून, हजारो टन फुलांची आवक होत आहे.
त्यामुळे पंढरी तुळस, फुलांच्या सुगंधाने दरवळून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आषाढीच्या पाच दिवसांत हार, फुले विक्रीतून लाखोंची उलाढाल होत असल्याचे येथील हार-फुले विक्रेत्यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
पंढरपुरात फुलांचा फार मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. या ठिकाणी निरनिराळ्या फुलांचा लिलाव होतो. आषाढी वारी काळात तुळशी हार, फुले यांना मोठ्या प्रमाणात मागणी होते.
पंढरपुरातून मंगळवेढा, सांगोला, अकलूज, खर्डी, सोलापूर, इंदापूर, म्हसवड, दिघंची, आटपाडी, सातारा, मोहोळ, मोडनिंब या ठिकाणाहून व्यापाऱ्यांची फुलांना मागणी आहे. पंढरपुरात यासाठी फुलांच्या बाजारपेठेत लिलाव केले जातात. त्यानंतर छोटे-मोठे हार विक्रेते हार तयार करून त्याची विक्री करतात.
भगवंताला हार गुंफण्याची तीन पिढ्यांची परंपरा
पंढरपुरातील देवमारे कुटुंब विठ्ठलास परिधान करण्यात येणारा तुळशीहार गुंफतात. विठ्ठलाच्या पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत विठ्ठलास दिवसातून किमान पाच वेळा तुळशीसह विविध फुलांचे हार परिधान केले जातात. मोगरा, अष्टर, निशिगंध, झेंडू, तुळस, केवडा अशा विविध फुलांचे सुबक असे हार बनवले जातात. हे हार बनवल्यानंतर हे हार मंदिरामध्ये विठ्ठलाच्या पूजेच्या अगोदर आणून देण्यात येतात.