मुंबई: राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदाही मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध जागांमध्ये 28 हजार 929 ने वाढ झाली असून, राज्यभरात एकूण 21 लाख 98 हजार 586 जागा उपलब्ध आहेत.
मात्र शनिवारी सायंकाळपर्यंत केवळ 12 लाख 9 हजार 618 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही 8 लाखांहून अधिक जागा रिक्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गतवर्षी राज्यभरात प्रथमच अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली होती. त्यावेळी उपलब्ध 21 लाख 69 हजार 657 जागांपैकी तब्बल 6 लाख 58 हजार 849 जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढावा, यासाठी शिक्षण संचालनालयाने दहावीची परीक्षा संपताच प्रवेश प्रक्रियेचा भाग-1 सुरू केला होता. नियमित प्रवेश फेरी 21 मेपासून सुरू असून ती 3 जूनपर्यंत चालणार आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या आकडेवारीनुसार राज्यभरातून 12 लाख 11 हजार 447 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 9 लाख 83 हजार 210 विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे. तर 8 लाख 5 हजार 791 विद्यार्थ्यांनी प्रवेश लॉक प्रक्रिया पूर्ण केली आहे. नियमित फेरीसाठी कोटा प्रवेशाच्या जागा वगळता 17 लाख 42 हजार 355 जागा उपलब्ध आहेत. त्या तुलनेत अर्जांची संख्या कमी असल्याने केवळ नियमित फेरीतच 5 लाख 30 हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
मुंबई विभागाने नोंदणीमध्ये आघाडी घेतली असून, तेथून सर्वाधिक 2 लाख 61 हजार 108 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 2 लाख 45 हजार 268 विद्यार्थ्यांनी शुल्क भरले असून, 1 लाख 99 हजार 384 विद्यार्थ्यांनी प्रवेश लॉक केला आहे. पुणे विभागातून 1 लाख 96 हजार 901 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, 1 लाख 49 हजार 869 विद्यार्थ्यांनी लॉक प्रक्रिया पूर्ण केली आहे.
नाशिक विभागातून 1 लाख 19 हजार 451, छत्रपती संभाजीनगर विभागातून 1 लाख 7 हजार 978, कोल्हापूर विभागातून 1 लाख 5 हजार 953, अमरावती विभागातून 99 हजार 632, नागपूर विभागातून 90 हजार 226 तर लातूर विभागातून 59 हजार 394 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये एकूण 5 लाख 97 हजार 446 मुलींनी तर 5 लाख 95 हजार 940 मुलांनी नोंदणी केली आहे.