मुंबई : प्रकाश साबळे
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या शिंदे गटाने हाती घेतलेले ऑपरेशन टायगर तूर्त थांबवण्यात आल्याचे समजते. अर्थात हे ऑपरेशन गुंडाळण्यात आलेले नसून, २२ नव्हे तर ४५ नगरसेवकांचा गट झाल्याची निश्चिती झाल्यानंतरच ठाकरे सेनेला खिंडार पाडण्याची व्यूहरचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
आधी उबाठा गटातील २२ नगरसेवक फोडले जाणार असल्याचे म्हटले जात होते. आता मात्र दोन तृतियांश संख्याबळाचा आकडा गाठून स्वतंत्र गट स्थापन केला जाईल. थेट ४५ नगरसेवकांचा प्रवेश करण्याच्या हालचाली शिंदे गटाकडून सुरू आहेत. बंडखोर नगरसेवकांचे हे संख्याबळ हाती येत नाही तोपर्यंत मुंबई महानगरपालिकेतील ऑपरेशन टायगर थांबविण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेत उबाठा पक्षाचे ६५ नगरसेवक आहेत. यापैकी २२ नगरसेवक शिंदे गटाकडे येण्यास उत्सुक आहेत. परंतु शिंदे गटाला दोन तृतियांश संख्याबळ पूर्ण करण्यासाठी किमान ४३ ते ४५ नगरसेवकांची आवश्यकता आहे. पुढील सहा महिन्यांत ४५ नगरसेवक गळाला लावण्यासाठी हे ऑपरेशन सुरु राहील. ४५ नगरसेवकांचा एकत्र प्रवेश शिंदे गटात होईल, अशी माहिती शिंदे गटातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
गुरुवारी महानगरपालिकेचे सभागृह होते. सभागृहाबाहेर उबाठा पक्षातील २२ नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. शिंदे गटाचे महानगरपालिकेतील गटनेते अमेय घोले म्हणाले की, किशोरी पेडणेकर यांना काय त्रास होतो हे आम्हाला माहीत आहे. उद्या जर त्या शिंदे गटात येणार असतील तर त्यांच्यासाठी आमची दारे उघडी आहेत. असेच लोक आम्ही आणणार आहोत.
कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी ४३ ते ४५ नगरसेवकांचा आकडा आम्हाला गाठायचा असल्याने शिंदे गटात येण्यास इच्छुक नगरसेवकांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. मात्र डिसेंबरच्या अखेरीस महापालिकेत तुम्हाला ऑपरेशन टायगर -२ पूर्ण झालेले दिसेल, असा दावाही घोले यांनी केला.
विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मात्र शिंदे गटात जाण्याची शक्यता फेटाळली. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे टायगर आहोत, आम्ही फुटणार नाही, अमेय घोले यांनी कधी टायगर पाहिले, असा टोला त्यांनी मारला.