Operation Tiger Pudhari
मुंबई

Operation Tiger: CM फडणवीसांची शिष्टाई आणि सहावा खासदार लागला गळाला; वाचा 'ऑपरेशन टायगर'ची Inside Story

शिवसेनेत प्रवेश द्यायचा की भाजपमध्ये यावर सुरू होता काथ्याकूट

पुढारी वृत्तसेवा

Operation Tiger CM Devendra Fadnavis

मुंबईv: राज्यात शिवसेना (ठाकरे गट) खासदार फोडाफोडीचे राजकारण रंगात आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे मौन बाळगून होते. मात्र एकीकडे राजकीय चर्चेचा धुरळा उडला असतानाच ‘ऑपरेशन टायगर’ची मोहीम फत्ते करण्याकरिता आवश्यक खासदारांचे संख्याबळ पूर्ण करण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचीच शिष्टाई मोलाची ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपमध्ये घ्यायचे की शिवसेनेत?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार पक्षांतर करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मौन बाळगले होते. मात्र, विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी "ऑपरेशन यशस्वी झाले आहे आणि रुग्ण एकदम सुदृढ आहे, त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाही," असे म्हणत प्रथमच या सर्व घडामोडींवर उघडपणे आपले मत व्यक्त केले होते. कारण 'ऑपरेशन टायगर'चे तर ठरले होते, परंतु त्यांना भाजपमध्ये घ्यायचे की शिवसेनेत, हेच ठरत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याबाबत मौन बाळगले होते.

बहुतांश खासदारांची हाती कमळ धरण्याची इच्छा!

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच खासदारांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. पण, जानेवारी २०२६ मध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून यावर गंभीरपणे विचार सुरू झाला. याआधी खासदार फोडण्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किमान पाच वेळा तरी भाजप श्रेष्ठींची भेट घेतली होती. परंतु, खासदारांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की शिवसेनेत, यावर निर्णय होत नव्हता. बहुतांश खासदारांची हाती कमळ धरण्याची इच्छा होती.

खासदारांना शिंदे यांच्या शिवसेनेतच प्रवेश देण्यासाठी फडणवीस आग्रही

मात्र, खासदारांना शिवसेनेतच प्रवेश दिला गेला पाहिजे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. याकरिता केंद्रीय नेतृत्वाबरोबर फडणवीस यांच्या बैठकाही झाल्या. शिवसेनेत प्रवेश द्यायचा की भाजपमध्ये, यावर काथ्याकूट झाल्यानंतर एप्रिलमध्ये ‘ऑपरेशन टायगर’करिता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील दाखवला.

फडणवीसांची महत्त्वाची भूमिका आणि ‘ऑपरेशन टायगर’ पूर्णत्वाला....

पाच खासदारांना आपल्याकडे वळविण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले. त्यावेळी प. बंगालमध्ये तृणमूलचे आमदार-खासदार फोडाफोडीचे राजकारण ऐन भरात होते. भाजप केंद्रीय नेतृत्वाकडून फडणवीस यांच्याकडे विचारणा होऊ लागली; परंतु खासदारांचे संख्याबळ पाचच्या पुढे जाण्यास तयार नव्हते. अखेर ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली गेली. मुख्यमंत्र्यांनी सहाव्या खासदाराशी संपर्क साधून त्याचे मन वळविले. त्याच्या राजकीय कारकिर्दीची जबाबदारी घेण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. यानंतर अखेर हा तिढा सुटला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सूत्रे वेगाने हलली आणि ‘ऑपरेशन टायगर’ पूर्णत्वाला आले. सहा खासदारांनी दिल्ली गाठत लोकसभा अध्यक्षांना पत्र देत ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT