मुंबई: महाराष्ट्रातील तब्बल सहा खासदार शिंदे यांचे नेतृत्व मान्य करणार असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली असताना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडू नये यासाठी मातोश्रीतर्फे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू झाले खरे. मात्र ते निष्फळ ठरले आहेत.
ओमराजे यांची मनधरणी करून ते शिंदे यांच्याकडे गेले नाहीत किंवा परत आले तर पक्षांतराला आवश्यक असलेला सहाचा आकडा त्या गटाला गाठता येणार नाही हे लक्षात घेत ठाकरे कुटुंबाने गेल्या दोन दिवसांपासून सहकाऱ्यांच्या साक्षीने त्यांना वश करण्याचे प्रयत्न सुरू केले होते.
शनिवार व रविवारच्या मध्यरात्री त्यांच्या घरी पुणे येथे ओमराजे यांचे निकटवर्तीय आमदार कैलास पाटील यांच्यासह आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू आमदार वरुण सरदेसाई यांनी सुमारे दोन तास मध्यरात्री त्यांच्याशी चर्चा सुरू ठेवली होती.
मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे परिवाराविरोधात कोणतेही विधान करणार नाही. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला या ओमराजे यांच्या विधानांचा आधार घेत त्यांना समवेत ठेवण्याचे प्रयत्न मातोश्रीने सुरू ठेवले.
ओमराजे हे पक्षाचे भविष्य असून त्यांच्या नाराजीकडे लक्ष दिले जाईल, असे म्हणणे होते. त्यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी रिलस्टार असा केल्यामुळे ते नाराज झाले आहेत. मात्र तरीही आपण सोमवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला जाऊ, असा शब्द ओमराजे यांनी दिला अशी चर्चा होती. त्यासंदर्भात पत्रकारांनी सरदेसाई यांना विचारायचा प्रयत्न केला असता सगळ्याच गोष्टी माध्यमांसमोर सांगता येत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
ओमराजे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर ते नक्की काय करणार याचा निर्णय घेणार होते. या बैठकीत कार्यकर्त्यांनी मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाला दूर करू नये असे आवाहन केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी आज अत्यंत आक्रमकरीत्या ओमराजे आणि निघून जाणाऱ्या खासदारांवर टीका केली आहे.
निधीसाठी आमच्या किडन्या विकू; कार्यकर्त्यांचे भावनिक आवाहन
ओमराजे यांना निधी हवा असेल तर आम्ही आमच्या किडन्या विकू, अशा प्रकारचे भावनिक आवाहन तेथील शिवसैनिकांनी केल्याची बातमी पसरली होती. ओमराजे ही आमची शेवटची आशा असून त्यांनी पक्षाचा निरोप घेऊ नये, असेही मातोश्रीवर मानले जात होते. उद्धव ठाकरे यांच्या विधानावरून ओमराजे यांनी गैरसमज करून घेऊ नये, असेही त्यांना सांगितल्याचे समजते. मात्र यानंतरही ओमराजे यांनी ऐकले नाही. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात आघाडी उभारण्याचाही विचार झाला आहे.