मुंबई : नेपाळमधील महापुरामुळे चीन-नेपाळ सीमेवर अडकून पडलेले ५४ यात्रेकरू अखेर गुरुवारी मुंबईत सुखरूप दाखल झाले. त्यात दोघे वगळता उर्वरित सर्व यात्रेकरू महाराष्ट्राचे असून उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या प्रत्येकी एका यात्रेकरूचा त्यात समावेश आहे.
सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच या यात्रेकरूंचे शिवसेनेने जंगी स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मिठाई भरवून आणि गुलाब पुष्प देऊन यात्रेकरूंशी संवाद साधला. या यात्रेकरूंनी राहुल शेवाळे यांच्यासह महाराष्ट्र शासन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले.
२२ ऑगस्टला ५४ जणांचा हा ग्रुप नेपाळमध्ये दाखल झाला होता. कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले हे यात्रेकरू नंतर महापुरामुळे चीनच्या सीमेवर अडकून पडले. शिवसेनेच्या मदत कक्षासोबत काठमांडूमध्ये दाखल झालेले राहुल शेवाळे यांनी या भाविकांंशी संपर्क साधून त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे व्हिडीओ कॉलद्वारे बोलनेही करून दिले.
५४ जणांचा हा ग्रुप मुंबईत येईपर्यंत आम्ही सर्वजण त्यांच्या संपर्कात होतो. हा क्षण म्हणजे शिवसेनेचा समाजकार्याचा वसा अधोरेखित करणारा क्षण आहे, असे राहुल शेवाळे म्हणाले.
‘‘या कठीण प्रसंगात आमच्याशी संपर्क साधून आम्हाला धीर दिल्याबद्दल आणि परत मुंबईत येण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारची मदत केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे यांचे आम्ही सदैव ऋणी राहू’’संजय सावंत, यात्रेकरू