मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ८ खासदार सोमवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पक्षाच्या खासदार तथा नेत्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या आठ खासदारांच्या संभाव्य भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रातील पाणीप्रश्न, पक्षाच्या खासदारांच्या मतदारसंघातील विविध विकासकामे आणि केंद्राशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ही भेट असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. एफसीआरए विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने कोणतेही विधेयक घाईघाईने मंजूर करण्याऐवजी सर्व संबंधितांशी चर्चा केली पाहिजे, अशी अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली.
चुकीच्या मार्गाने आलेला पैसा, ड्रग्जचा पैसा किंवा गैरव्यवहाराचा पैसा असेल तर त्याला निश्चितच विरोध झाला पाहिजे. मात्र, मदत करण्याच्या उद्देशाने कोणी पैसे देत असेल, तर प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने पाहण्याची गरज काय, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला. या विषयावर सरकारसोबत संयुक्त चर्चा करण्यास आम्ही तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डिलिमिटेशन विधेयकाबाबतही सुळे म्हणाल्या, हे विधेयक अद्याप आलेलेच नाही. इंडिया आघाडीची दररोज सकाळी बैठक होते. चर्चा करूनच आम्ही भूमिका ठरवतो.
राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार नियम आणि अटी घालते. मात्र ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अशा प्रकारचे निकष का लावले गेले नाहीत. यावरून केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतले जात असल्याचा आरोपही सुळे यांनी केला.