मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा-शिवसेना महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अवघे तीन नगरसेवक असतानाही त्यांना सत्तेत वाटा मिळणार आहे. काही समित्यांच्या सदस्य पदासह विशेष समित्यांचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्रित घेऊन निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला होता. परंतु मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा शिवसेना महायुती बहुमतास आली असली तरी समितीतील सदस्य संख्यांचा आकडा जुळवण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यावेच लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना महापालिकेच्या सत्तेत घेण्यास काही हरकत नसल्याचे खुद्द भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामील होणार असल्यामुळे समित्यांमधील महायुतीची सदस्य संख्याही वाढणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सत्तेमध्ये होणारा फायदा लक्षात घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनाही काही समित्यांचे सदस्य पद देण्याची भाजपा व शिवसेनेची तयारी आहे. एवढेच काय तर येणाऱ्या पाच वर्षात किमान एकदा विशेष समित्यांचे अध्यक्ष पदही दिले जाणार आहे.
त्यामुळे तीन नगरसेवक निवडून येऊनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना सत्तेमध्ये सामील होता येणार आहे. त्यामुळे सत्ताधारी म्हणून नगरसेवकांना अतिरिक्त विकास निधी मिळू शकतो. दरम्यान महायुती सोबत सत्तेत सामील होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तिन्ही नगरसेवक उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे.
शरद पवारांचे एकमेव नगरसेवक विरोधात बसणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुंबई एकमेव नगरसेवक निवडून आले आहेत. मालाड प्रभाग क्रमांक 43 मधून शरद पवार गटाचे अजित रावराणे निवडून आले आहेत. परंतु अजित रावराणे यांनी आपण महाविकास आघाडीचे घटक असून शरद पवार यांचे खंदे समर्थक आहोत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण विरोधी पक्षात बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.