मुंबई : ‘एनसीईआरटी’ने तयार केलेल्या आठवीच्या हिंदी आणि उर्दू पुस्तकातून ‘मराठा साम्राज्याचा नकाशा’ वगळल्याचे संतप्त पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. विरोधकांनी याबाबत ठोस कारवाईची मागणी करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. अखेर, यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठविले असून, त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
विधान परिषदेत सोमवारी काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी ‘एनसीईआरटी’च्या पाठ्यपुस्तकातील ‘मराठा साम्राज्याचा नकाशा’ वगळल्याबाबत चर्चा उपस्थित केली होती. त्यावेळी बोलताना पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले.
हा विषय मराठा साम्राज्याच्या नकाशाच्या संदर्भातील आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात संबंधित व्यक्तीला 7 जानेवारी 2026 रोजी उत्तर मिळालेले आहे. तसेच, 30 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा व्यापक स्वरूपात अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी ‘सीबीएसई’ला विनंती करण्यात आल्याचे उत्तरात म्हटले आहे. त्याच अनुषंगाने ‘एनसीईआरटी’च्या आठवीच्या पुस्तकात छत्रपती शिवरायांवर ‘द राईज ऑफ महाराष्ट्र’ या धड्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, जेव्हा हा धडा तयार करण्यात आला आणि त्याबाबत चर्चा झाली, तेव्हा त्या नकाशातील त्रुटी सरकारच्या लक्षात आल्या नव्हत्या का, असा सवाल पाटील यांनी केला.
त्यावर, राज्यमंत्री भोयर यांनी त्रुटींची कबुली देऊन यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी 9 मार्च रोजी केंद्र सरकारला लेखी विनंती केल्याचे आणि याबाबत पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट केले.
राज्यमंत्र्यांच्या उत्तराला हरकत घेत विरोधी बाकांवरील आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. यावेळी राज्यमंत्री आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. या गोंधळात विरोधकांकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी, जय शिवाजी...’ अशा घोषणा देण्यात आल्या. अखेर, या गोंधळात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप करत विरोधकांना शांत राहण्याचे आणि मंत्र्यांना फक्त नकाशापुरते बोलण्याची सूचना केली. त्यानंतर या वादावर पडदा पडला.