Navi Mumbai Water Supply Pudhari
मुंबई

Navi Mumbai Water Supply: मोरबे धरणात १७ टक्के पाणीसाठा; जुलैअखेरपर्यंत पाणचिंता नाही

तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने 10 टक्के पाणीकपात लागू केली असून नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा जपून व गरजेपुरताच वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबईकरांना जुलैअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा मोरबे धरणात उपलब्ध असून शहरात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही असा विश्वास नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी धरणातील पाणीसाठ्याची पाहणी केल्यानंतर दिला.

तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने 10 टक्के पाणीकपात लागू केली असून नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा जपून व गरजेपुरताच वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

त्यांनी यावेळी मोरबे धरण, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, आग्रोली पंपिंग स्टेशन तसेच शहरातील जलवितरण व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी उपमहापौर दशरथ भगत, पाणीपुरवठा समिती सभापती रविकांत पाटील, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता शंकर जाधव, संतोष उनवणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मोरबे धरणाची कमाल जलपातळी 88 मीटर असून सध्या धरणातील पाण्याची पातळी 72 मीटर आहे. धरणात सध्या सुमारे 17 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून तो जुलैअखेरपर्यंत पुरेसा असल्याचे त्यांनी सांगितले.

पाणी शुद्धच : महापौर

नवी मुंबईत अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. महापौरांनी आज मारबे धरणाला भेट देत थेट जलाशयातील पाणी प्राशन करीत पाण्याच्या शुद्धतेची खात्री दिली. धरणातून येणाऱ्या पाण्यावर भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात विविध प्रक्रिया केल्या जातात.

त्यानंतर आग्रोली पंपिंग स्टेशन आणि शहरातील विविध जलकुंभांवरही नियमित पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळे शहराला कुठेही अशुद्ध पाणी पुरवठा होत नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT