

गणेश शिंदे
मुंबई: मुंबईतील बाजारपेठेत शालेय साहित्य दरात यावर्षी वाढ दिसून येत असून, कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि वाहतूक खर्च वाढल्याने ही दरवाढ होऊ लागली आहे. शालेय साहित्याच्या दरात सरासरी 10 ते 15 टक्के वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी पुढारीशी बोलताना वर्तवली.
मुंबईतील मस्जिद बंदर,काळबादेवी परिसर,दादर बाजारपेठेतील विक्रेते वसई-विरार,वापी घाऊक बाजारातून तसेच भिवंडी येथील कारखान्यातून शालेय साहित्य खरेदी करतात.
युद्धस्थिती, इंधन महागाईने कागद निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. कागदाचा दर 70 रुपये किलो वरून 100 रुपयांच्या घरात गेला आहे. त्यामुळेच शालेय साहित्य दरात वाढ होणार असल्याचे विक्रेते यांचे म्हणणे आहे.
आता पहिलीच्या पुस्तकाच्या संचाचा दर साधारणत: तीनशे रुपये, तर दहावीच्या पुस्तकाचा संच सुमारे 800 रुपये असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
शाळेचे दप्तर (स्कूल बॅग) 400 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत जातील. दर्जेदार कंपनीचे दप्तर दोन हजार ते 2200 रुपयांपर्यंत मिळेल. 100 पानी वहीसाठी 25 रुपये, 200 पाने वहीसाठी 65 रुपये, तर 400 पानांच्या वहीसाठी 175 रुपये मोजावे लागू शकतात.
शालेय साहित्यसाठी 18 टक्के जीएसटी आहे. जीएसटी आणि वाहतूक खर्च वाढल्याचा विचार करून यावर्षी शालेय साहित्य दरात सरासरी 10 ते 15 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
- राजेंद्र शेट्ये, विक्रेते रानडे रोड, दादर पश्चिम