नवी मुंबई: एल निनोमुळे लांबलेला मान्सून आणि मारबे धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच शिल्लक राहिलेला पाणीसाठा पाहता बारा महिने २४ तास पाणी देणार्या नवी मुंबई महापालिकेनेही पाणी वापरावर निर्बंध लागू केले आहेत.
तरण तलाव, वॉशिंग सेंटरला होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे. बांधकामांना प्रक्रियायुक्त पाणीच वापरता येणार आहे. तर व्यावसायिक संकुलांना २० टक्के पाणीकपात लागू केल्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
मुंबईनंतर नवी मुंबईतील पाणी वापरावर महापालिकेने कडक निर्बंध लागू केले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणार्या मोरबे धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे तर बारवी धरणाने तळ गाठला आहे.
त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत घट झाल्याने नवी मुंबईत पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या उद्भवली आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी पुरेल असे नियोजन राज्य सरकारच्या आदेशानुसार करण्यात आले आहेत.
पाणीचोरी करताना आणि गैरवापर करताना कुणीही आढळले तर त्यांना पहिल्या आणि दुसऱ्या चुकीला थेट २५ आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल. मात्र तिसऱ्यांदा चुकी केल्यास एक लाख दंड आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले.
पाणी बचतीसाठी दहा कलमी कार्यक्रम
वॉशिंग सेंटर्सचा पाणीपुरवठा तत्काळ बंद
पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास २५ हजार ते १ लाख दंड आणि फौजदारी कारवाई
व्यावसायिक आस्थापनांना २० टक्के कपात
जलतरण तलावांचा पुरवठा तात्पुरता बंद
बांधकामासाठी फक्त प्रक्रियाकृत पाणी वापर
एनएमएमटी बस डेपो, उद्याने, ट्री बेल्ट येथे प्रक्रियाकृत सांडपाण्याचा वापर
अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई
दरडोई पाणीपुरवठा २२० वरून १७५ लीटरवर
पावसाचे पाणी साठवणे बंधनकारक
अपव्यय आढळल्यास कठोर कारवाई