नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान थेट मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी ‘मेट्रो मार्ग ८’ (गोल्डन लाईन) आखण्यात आला असून, याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) येत्या ३ ते ४ महिन्यांत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही विमानतळांमधील प्रवासाचा वेळ ३० ते ४० मिनिटांवर येणार असल्याची माहिती सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांनी दिली.
रस्त्याने प्रवास करण्यासाठी १.५ ते २ तास लागतात. मेट्रो मार्ग ८ हा मानखुर्द, सागर संगम आणि बेलापूरमार्गे नवी मुंबई विमानतळाला जोडेल. यामध्ये थेट एक्स्प्रेस मेट्रो गाड्या चालवण्याचे नियोजन असून त्यामुळे दोन्ही विमानतळांमधील संपर्क अधिक गतिमान आणि सुलभ होईल.
आरोग्य, शिक्षण आणि गृहनिर्माण क्षेत्राला गती
नवी मुंबई, उल्वे, पनवेल आणि 'तिसरी मुंबई' परिसरात सिडकोतर्फे ६७ हजार परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली जात आहे. अटल सेतूमुळे मुख्य भूमीशी जोडल्या गेलेल्या या भागात विमानतळ-केंद्रित विकासाअंतर्गत 'एरोसिटी', 'एड्युसिटी' (आंतरराष्ट्रीय विद्यापीठे) आणि 'मेडिसिटी' (जागतिक दर्जाची रुग्णालये) उभारली जाणार आहेत.
संवादातून मार्ग आणि ६०:४० भू-संपादन मॉडेल
नैना व तिसऱ्या मुंबईच्या विकासात जुन्या चुका टाळण्यासाठी 'टाऊन प्लॅनिंग स्कीम्स'अंतर्गत ६०:४० भू-संपादन मॉडेलवर काम केले जात आहे. यात ६० टक्के जमीन मूळ मालकाकडे राहते, तर ४० टक्के जमीन रस्ते, उद्याने आणि नागरी सुविधांसाठी वापरली जाते. स्थानिक ग्रामस्थांशी थेट संवाद साधून आणि सीमांकन अचूक करून सर्व कायदेशीर प्रश्न सोडवले जात आहेत.
सिडकोच्या नोड्समध्ये दररोज ५० एमएलडी पाण्याची तुट असून ती भरून काढण्यासाठी बारवी आणि न्हावा शेवा टप्पा-३ योजनेतून पूर्ण क्षमतेने पाणी मिळवणे आवश्यक आहे.
प्रलंबित बाळगंगा धरण प्रकल्पातील कायदेशीर अडचणी दूर झाल्यास नवी मुंबई व तिसऱ्या मुंबईचा पुढील २०६० ते २०७० पर्यंतचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकेल असा विश्वास अश्विन मुदगल व्यक्त केला.