मुंबई : प्रत्येक महिलेपर्यंत तिच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने जावे, असा प्रयत्न अध्यक्ष विजया रहाटकर करत असून देशातील 500 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने आत्तापर्यंत तक्रारींवर जनसुनावणी घेतली आहे. आयोगाच्या मदत, सेवा विभाग तसेच विधी सल्ला केंद्रांमार्फत देशातील समस्याग्रस्त महिलांना मदत करावी किंवा आर्थिक भरारीसाठी सल्ला द्यावा, असे जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी यासंदर्भात घेतलेल्या पुढाकारानंतर देशातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचण्याचे आणि तेथील महिलांना आयोग आपल्या पाठीशी आहे, हा दिलासा देण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. दिल्ली येथे दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यशाळेत रहाटकर आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांनी महिलांपर्यंत पोहोचण्याच्या विविध उद्देशांसाठी काय करता येईल याबद्दल विचार मंथन केले.
काही राज्यांमध्ये महिलांसाठी तेथील राज्य सरकारांनी अद्याप आयोग स्थापन केलेला नाही. ज्या राज्यांमध्ये असे आयोग स्थापन झालेले नाही, त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाशी.संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे
मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, राजस्थान, दिल्ली आणि तेलंगणा या राज्यांमध्ये अद्याप महिला आयोगाची स्थापना झालेली नाही. तेथे महिलांना दिलासा मिळावा यासाठी लवकरात लवकर या संदर्भात पाऊले उचलण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हेल्पलाईन 14490 ही महिलांनी कायम उपयोगात आणावी, असे आवाहनही त्यांनी केले. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील महिलाविषयक कार्यक्रम आणि कायदे मोठ्या प्रमाणात बदलले आहेत. मात्र त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आणि गरजू महिलांनी त्याची उपयोगिता जाणणे याकडे लक्ष देणे हे सध्या मोठे आव्हान असल्याचेही कार्यशाळेत सांगितले गेले.
500 जिल्ह्यांमध्ये जन सुनावणी झाली आहे. आता उर्वरित ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यक्रम करत तेथे महिलाविषयक धोरणे जनतेपर्यंत कशी पोहोचवता येईल यावर आयोग विचार करणार आहे. तंत्रज्ञानाने महिलांचे आयुष्य पार बदलले आहे. त्याचा योग्य वापर केल्यास महिलांची कामे कमी होतील आणि त्या स्वतःचे योगदान देऊ शकतील, असेही रहाटकर दिल्ली येथे म्हणाल्या.