मुंबई : मिलींद कारेकर
एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गोमातेला राजमातेचा दर्जा बहाल केला होता. परंतु उन्हातान्हात पावसा-पाण्यात एखाद्या इमारतीखाली रस्त्याच्या कडेला याच गोमातेला घेऊन उभ्या राहणाऱ्या महिलांवर आणि गोमातेवर पोलीस प्रशासन आणि महापालिका वेळी-अवेळी कारवाई करत असल्यामुळे हिंदूंच्या राज्यातच आता गोमाता संकटात सापडली आहे.
गोमातेचे पालनपोषण आणि संरक्षण करणारा नाथपंथी आणि डावरी गोसावी समाज या कारवाईविरोधात येत्या 25 मार्च रोजी मुंबईतल्या आझाद मैदानावर धडक देऊन जोरदार आंदोलन करणार आहे.
मुंबईत तब्बल 5 हजारांहून अधिक गोमातांची सेवा करणाऱ्या महिला-भगिनी कार्यरत आहेत. या समाजाकडे उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे गोमातेला नाथपंथी आणि डावरी समाज स्वतःच्या आईप्रमाणे जपणूक करत असतात. एकटा माणूस घर चालवू शकत नसल्यामुळे या महिला, त्यांची मुलेबाळे, आई आज्जीच्या हातून चारा पाण्याचा घास ग्राहकांमार्फत गाईला देण्यासाठी मदत करताना कित्येकदा दिसून येतात.
मुळातच गरीब असलेला हा समाज दुसऱ्याकडून गाई भाड्याने घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालवतो. त्यातून वारंवार होणाऱ्या कारवायांमुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कमाईपेक्षा जास्त दंड भरावा लागत असल्यामुळे कारवाईआधी पुनर्वसनाची मागणी महिलांनी उचलून धरली आहे.
यासाठी समाजातील काही शिक्षित होतकरू मंडळी एक मोठी सभा घेऊन येत्या 25 मार्च रोजी पोलीस प्रशासन आणि पालिकेच्या कारवाईविरोधात जोरदार आंदोलन करून फेरीवाल्यांच्या धोरणात नाथपंथी डावरी गोसावी समाजातील महिलांना सामावून घेण्याची मागणी करणार आहे.
क्यूआर कोडचीही मागणी
या आंदोलनाच्या माध्यमातून फेरीवाल्यांच्या धोरणात सामील करून परवाना उपलब्ध करून देण्याच्या समाजाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. त्याचबरोबर पिढ्यानपिढ्या गाईवर उदरनिर्वाह चालवणाऱ्या या समाजाने क्यू आर कोडची देखील मागणी केल्याची माहिती गोसेवा संस्थेच्या कल्पना चव्हाण यांनी दिली आहे.