मुंबई ः मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यामुळे मुंबईतील गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय 2026-27 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव मुंबई महापालिकेकडे तयार असून तो महापालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी लवकरच सादर करण्यात येणार आहे.
लोकसभा त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे मुंबईत गेल्या दोन वर्षात पाणीपट्टीमध्ये वाढ होऊ शकली नाही. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकीनंतर पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात येणार होती. मात्र, मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पाणीपट्टी वाढीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. आता मुंबई महापालिका निवडणूक ही पार पडली असून येणाऱ्या चार वर्षांत कोणती निवडणूक नसल्यामुळे पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
पालिकेच्या पाणीपुरवठा लेखा विभागाने हा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच महापालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. महापालिका अर्थसंकल्पनंतर या प्रस्तावाला मंजुरी देऊन पुढील आर्थिक वर्षापासून त्याचे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जल अभियंता खात्याचा आस्थापना खर्च (कर्मचाऱ्यांचा पगार व अन्य भत्ते), प्रशासकीय खर्च, प्रचालन व परिरक्षण खर्च, विद्युत खर्च व शासनाच्या भातसा व अप्पर वैतरणा धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी यांच्या एकत्रिक खर्चाचा आढावा घेऊन, ही पाणीपट्टी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ सरासरी 6 ते 7 टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे घरगुती पाणीपट्टीमध्ये प्रति हजार लिटर मागे सरासरी एक रुपयापर्यंत तर व्यावसायिक तीन ते चार रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय एकूण पाणी बिलाच्या 70 टक्के मलनि:सारण आकार वसूल करण्यात येणार आहे.
पाणीपट्टीतून 2,300 कोटी उत्पन्न
मुंबई महानगरपालिकेला पाणीपट्टीतून दरवर्षी 2 हजार 300 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळते. 2026-27 या आर्थिक वर्षात सुमारे 2,500 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.