मुंबई : चेंबूर येथे दोन तरुणांवर सहाजणांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सिद्धार्थ कांबळे (वय ३२)या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र विकास शाहिदास धेंडे हा गंभीररित्या जखमी झाला. ही घटना रविवारी (दि.२१) रात्री साडेनऊ वाजता वाजता चेंबूरच्या वाशीनाका, मुकूंदनगर, इमारत क्रमांक सहासमोर घडली होती. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या सहाही आरोपींना आरसीएफ पोलिसांनी सोमवारी (दि.२२) अटक केली. त्यांच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत कारवाई केली असून याच गुन्ह्यांत ते सर्वजण पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिताराम शहाजी जगताप, सुरेश ऊर्फ सुरज शहाजी जगताप, रुपेश जयंत वैराळे, सागर तुकाराम कांबळे, सुधाकर जगन्नाथ अवसरमल, रुपेश तुकाराम कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या सहाजणांची नावे आहेत. चेंबूर परिसरात मृत सिद्धार्थ, जखमी विकास आणि अटक आरोपी राहत असून ते सर्वजण एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांच्यात पूर्वीचा वाद होता. याच वादातून रविवारी रात्री या आरोपींनी सिद्धार्थला बेदम मारहाण केली. त्यात विकासने मध्यस्थी करुन त्यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या सहाजणांनी या दोघांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान सिद्धार्थचा मृत्यू झाला तर विकासला रुग्णालयात उपचार सुरू होते.
स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच याप्रकरणी विकासच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सहाही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्हयांत पळू गेलेल्या सहा आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून सोमवारी (दि.२२) दुपारी अटक केली. चौकशीत सिताराम जगताप, सुरेश जगताप आणि रुपेश वैराळे हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सितारामविुद्ध सहा, सुरेशविरुद्ध तीन तर रुपेशविरुद्ध एक गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.