मुंबई : शहरातील दरड प्रवण क्षेत्रात संरक्षक जाळ्या बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे तसेच नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे, याला आमचे प्राधान्य आहे. तर मुंबई दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त करण्याचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
घाटकोपर, आझाद नगर येथील अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या व संभाव्य दरडीच्या ठिकाणी पालिकेच्यावतीने उपाययोजना म्हणून संरक्षक जाळी (जीओ नेटिंग) बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. मुंबईतील संभाव्य ३१ ठिकाणी दरडप्रवण क्षेत्राची स्थिती पाहता अत्याधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर या निमित्ताने सुरू झाला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत यावेळी आमदार दिलीप लांडे, पालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.
स्वित्झर्लंड मटेरिअलचा वापर करत बोल्टिंगचे काम हनुमान टेकडी परिसरात सुरू करण्यात आले आहे. एकूण २५०० चौरस मीटरच्या क्षेत्रात बोल्टिंगचा वापर करत हे दरडप्रवण क्षेत्रात दगड रोखून धरण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एकूण १६ जणांचा प्रशिक्षित चमू दोन पाळ्यांमध्ये हे काम करत आहे. माती तसेच काळा पाषाण या दरडप्रवण क्षेत्रात आहे. बोल्टिंगचा उपयोग हा पावसाळ्यात पाण्यामुळे खाली सुटून येणारे दगड रोखण्यासाठी होतो. ड्रिल करून सुमारे ८ मीटर इतके आत दगडात वापरण्यात येतात.