मुंबई : मुंबई महापालिकेच्या मार्च माहिन्यातील पहिल्या सभेत मुंबईतील पाणी टँकर माफियांचा विषय चांगलाच गाजला. सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहरातील पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. याला निमित्त होते वॉर्ड 86 मधील शिंदे गटाचे नगरसेवक रितेश राय यांनी 66 ब नियमानुसार पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी नगरसेवकांनी टँकर माफियांनी शहर ताब्यात घेतल्याचा आरोप केला.
यावेळी सभागृह नेते गणेश खणकर म्हणाले की, खासगी टँकर पाणी पुरवठ्यासाठी 3,500 ते 4,000 रुपये आकारतात. त्यांच्याविरोधात आवाज उठवल्यास ते नगरसेवकांना तलवारीने हल्ला करण्याची धमकी देतात. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरली आहे. पाणीपुरवठा झाला तरी ते एकतर अस्वच्छ असते किंवा पाण्याचा दाब खूप कमी असतो. ही व्यवस्था टँकर माफिया नव्हे, तर मुंबई महापालिकेचे नगरसेवक चालवितात, असा धक्कादायक आरोप केला.
चर्चेत भाग घेतांना एमआयएम गटाचे नेते विजय उबाळे म्हणाले की, गोवंडी झोपडपट्टी परिसरातही पाण्याची समस्या आहे. दूषित पाण्यामुळे रहिवाशांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पाणी पुरवठ्याची कोणतीही निश्चित वेळ नाही. कधी पहाटे 4 वाजता तर कधी पहाटे 2 वाजता पाणीपुरवठा होतो. यामुळे रहिवाशांना त्रास होतो. पाईपलाईनला गळती लागल्यास ती दुरुस्त करण्यासाठी महापालिकेला चार ते पाच दिवस लागतात. याचा नागरिकांना त्रास होतो.
भाजपचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी महापालिका प्रशासनाचा टँकर माफियांसोबत करार आहे. उंच इमारतीतील नागरिक खासगी टँकर माफियांना दरमहा 20 ते 25 लाख रुपये देतात. महापालिका पाईपलाईन गळतीकडे कानाडोळा करते, जे तिचे अपयश दर्शवते. शहरात खासगी विहिरींची संख्या वाढली असून त्याची मोजणी झाली पाहिजे. टँकर माफिया या विहिरींमधून पाणीपुरवठा करतात. घाटकोपरमधील एलबीएस मार्गावर अनेक टँकर उभे असतात. देखभाल कर, पाणी कर आणि सांडपाणी कर भरूनही लोकांना पाणी मिळत नाही. ही एक गंभीर समस्या असून त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे छेडा म्हणाले.
याबरोबारच भाजपचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांनीही चर्चेत सहभागी होत मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर मानले जात असताना आपण पाण्याच्या समस्येवर चर्चा करत आहोत ही चिंतेची बाब आहे. यावर उत्तर देताना, अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर म्हणाले की, शहराची लोकसंख्या 12.5 कोटींहून अधिक असून त्यात अंदाजे 2 कोटी तात्पुरत्या रहिवाशांचा समावेश आहे. त्यांना रोज 4,662 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. आम्ही पाण्याचे स्रोत कसे वाढवायचे याचा विचार करत आहोत. आम्ही जलशुद्धीकरण प्रकल्प उभारत आहोत. पालघरमध्ये गारगाई धरण बांधण्याचाही प्रस्ताव आहे. या दोन प्रकल्पांमधून 640 एमएलडी पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प अंदाजे चार ते पाच वर्षांत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. पाण्याची गळती लवकरात लवकर थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
बीएमसीने 24 तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले होते, पण ते अद्याप पूर्ण झालेले नाही. कुर्ला दक्षिणमध्ये चार ते पाच वॉर्ड आहेत जिथे पाण्याचा दाब कमी आहे. पूर्वसूचना न देता कोणत्याही क्षणी पाणीपुरवठा खंडित होऊ शकतो. बीएमसी प्रतिटँकर 600 रुपये आकारते, तर खासगी टँकर्स सुमारे 3,500 रुपये आकारतात. त्यामुळे, बीएमसीने आपल्या टँकर्सची संख्या वाढवण्याची गरज आहे. दूषित पाणी आणि पाणी पुरवठ्याचा मुद्दा गांभीर्याने घेतला पाहिजे.अशरफ आझमी, काँग्रेस गट नेते
टँकर माफिया ही एक गंभीर समस्या आहे. माझ्या प्रभागात 10 ते 12 इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. या इमारतींच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या पाण्यासाठी बिल्डर्स बेकायदेशीर जोडण्या घेतात, जेणेकरून त्यांना पाण्याची बिले भरावी लागणार नाहीत. पावसाचे पाणी साठवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासंदर्भात मी बीएमसीच्या इंजिनिअरला पत्र लिहिले आहे. कमी दाबामुळे लोकांना मोटारी वापराव्या लागत असल्याचे वॉर्ड क्र. 211 चे काँग्रेस नगरसेवक वकार खान यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.