मुंबई: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत अवघा १३ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठा ८८ हजार ८८८ दशलक्ष लीटरवर आला आहे. त्यामुळे पालिकेची चिंता वाढली असून पाण्याचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न पडला आहे.
कोकण, पुणेमध्ये मान्सून दाखल झाला, मात्र अजून मुंबईत मान्सून दाखल झालेला नाही. विशेषत: ठाणे जिल्ह्यातील तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापपर्यंत पाऊस आलेला नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाची चिंता वाढली आहे. अप्पर वैतरणा तलाव आठवडापूर्वीच आटला.
तानसा तलावातही आता जेमतेम १२ हजार दशलक्ष लिटर इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे. तर सहाही तलावांतील पाणीसाठा १ लाख ९१ हजार दशलक्ष लिटरवर आला आहे. शहराला होणारा रोजचा पाणीपुरवठा व बाष्पीभवनाने वाया जाणाऱ्या पाण्याचा विचार केल्यास जेमतेम महिनाभर पुरेल इतके पाणी आहे.
तलावांत असलेला पाणीसाठा किमान जुलै अखेरपर्यंत शिल्लक राहणे आवश्यक आहे. पण सध्याचा साठा जेमतेम १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच आहे. त्यामुळे तलाव क्षेत्रात १५ जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस पडला नाही तर राखीव कोट्यातील पाणी घ्यावे लागेल, असे एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले. परंतु मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यामुळे येत्या आठवडाभरात तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडेल अशी अपेक्षा असल्याचेही या अभियंत्याने सांगितले.
४ दिवसांत भातसातील १०,४०८ दशलक्ष लिटर पाणी आटले
मुंबई शहराला दररोज २ हजार दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठ्यात गेल्या चार दिवसात १०,४०८ दशलक्ष लिटर इतकी कपात झाली. ४ जूनला या तलावामध्ये ९९,४९६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. हा पाणीसाठा ८ जून सकाळी ६ वाजेपर्यंत ८८,८८८ पर्यंत खाली आला.